अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अरणगाव (ता. अहिल्यानगर) येथील मिठू कार्तिक दत्त (वय 42) यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दडपला, पुरावे नष्ट केले आणि तपास हेतुपुरस्सर विलंबित ठेवला, असा गंभीर आरोप अहिल्यानगर तालुका पोलिसांवर झाला आहे. आता जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या संपूर्ण घटनेची दखल घेत वस्तुस्थितीची पडताळणी सुरू केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, यासंदर्भात अधीक्षक घार्गे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. ‘सार्वमत’ने बातमी प्रसिध्द केल्यानंतर हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे.
साकत (ता. अहिल्यानगर) येथील तक्रारदार सोमनाथ चितळकर यांनी मिठू दत्त यांच्या मृत्यूप्रकरणी तालुका पोलिसांवर थेट गुन्हा दडपल्याचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी काही दिवसांपूर्वीच अधीक्षक घार्गे यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती व तक्रार केली होती. यानंतर अधीक्षक घार्गे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून आकस्मात मृत्यू संदर्भातील कागदपत्रे पोलीस ठाण्याकडून मागवली आहे. आम्ही वस्तुस्थितीची पडताळणी करत आहोत आणि योग्य ती पावले उचलू, असे घार्गे यांनी सांगितले. अधीक्षक घार्गे यांच्या या भूमिकेमुळे आता या प्रकरणात पुढील घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तक्रारीनुसार, 6 मार्च 2025 रोजी अरणगावजवळील व्हीआरडीई गेट परिसरात मिठू दत्त यांच्यावर हातोड्याने हल्ला झाला. पोलिसांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले आणि एमएलसी नोंदविण्यात आली. घटनेतील हातोडाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा आहे. जखमी मिठू दत्त यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ससून रूग्णालयात हलविण्यात आले आणि 23 मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. पण, 29 मार्च रोजी पोलिसांनी फक्त आकस्मात मृत्यू नोंदवला आणि आठ महिन्यापासून गुन्हा दाखल केला नसल्याने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.




