त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
‘माझे जीवीची आवडी नेई पंढरपुरा गुढी’, असे म्हणत संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज (Sant Nivruttinath Maharaj) यांच्या पालखीचे पंढरपूर (आषाढी) वारीसाठी त्र्यंबकेश्वरमधून (Trimbakeshwar) आज (मंगळवारी) भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. यावेळी येथे जमलेल्या हजारो वारकऱ्यांनी भजन करीत टाळ मृदुंगाचा गजर केला. वारकऱ्यांच्या विठुरायाच्या जयघोषांनी त्र्यंबकनगरी दुमदुमुनी गेली होती.
सनई चौघडे आणि टाळ-मृदुंगाचा गजर, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो वारकरी, त्यांच्या हातात असलेले भगवे ध्वज आणि “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय” चा गजर करत दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाथांच्या मंदिरासमोरुन पालखीचे प्रस्थान झाले. त्यानंतर कुशावर्त कुंडावर पूजा करून पालखी त्र्यंबकराज मंदिरापासून पुढे पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला.
दरम्यान, यावेळी पानाफुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथामध्ये संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची मुर्ती व पादुका ठेवण्यात आल्या होत्या. तसेच रथास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.तसेच रथाच्या मागे मानाच्या दिंड्या अतिशय शिस्तबद्ध रित्या सहभागी झाल्या होत्या. १० जून ते ०५ जुलै या २५ दिवसांत त्र्यंबकेश्वर येथून निघालेली नाथांची पालखी पंढरपूर (Pandharpur) येथे आषाढी वारीला पोहोचणार आहे.