शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
राज्यासह देशभरात खळबळ उडवणार्या भोंदू अशोक खरात प्रकरणात अखेर शिर्डी पोलिसांनी निर्णायक कारवाई करत मुख्य आरोपी अशोक खरात याला नाशिकमधून ताब्यात घेतल्याने या गाजलेल्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. भोंदूगिरीच्या आडून सामान्य नागरिकांची फसवणूक करणार्या या रॅकेटचे धागेदोरे आता खोलवर उलगडू लागले असून तपास यंत्रणांनी चक्रे वेगाने फिरवली आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरात भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिर्डी पोलिसांनी अशोक खरात याला नाशिक येथून ताब्यात घेतले असून त्याच्यासह त्याच्या पत्नीवर शेतकर्याची फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीने एका शेतकर्याला विविध आमिष दाखवत मोठ्या प्रमाणात आर्थिक गंडा घातल्याचा आरोप आहे. भोंदूगिरी च्या माध्यमातून विश्वास संपादन करून नंतर पैशांची उकळपट्टी केल्याचे तपासात समोर येत आहे. याशिवाय, कायद्याला हरताळ फासत बेकायदेशीर सावकारीचे जाळे उभारल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी राहता ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. सध्या अशोक खरात शिर्डी पोलीस ठाण्याच्या कोठडीत असून रात्रभर त्याची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.उद्या आरोपीला राहता न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात आणखी कोणाचे हात आहेत का, किती जणांना फसवण्यात आले आहे, आणि आर्थिक व्यवहारांचा खरा आकडा किती आहे, याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.या कारवाईमुळे भोंदूगिरीच्या आडून सुरू असलेल्या फसवणूक साखळीवर मोठा आघात बसण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.





