नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दुबईत खेळवण्यात आलेल्या आशिया चषक २०२५ च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल (२८ सप्टेंबर) अंतिम सामना झाला. या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. महत्वाचे म्हणजे, अंतिम सामन्यातील विजयानंतर, या स्पर्धेची ट्रॉफी पाकिस्तानचे गृहमंत्री तथा आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हातून स्वीकारण्यासही सघाने ठाम नकार दिला. मोहसिन नकवी बराच वेळ तेथे वाट बघत उभे होते. मात्र, भारतीय संघ ट्रॉफी घेण्यासाठी समोर आलाच नाही. अखेर अपमानित होऊन मोहसिन यांना तेथून निघून जावे लागले.
या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक्सवर ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. मैदानातही ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच, भारताचा विजय…, असे नरेंद्र मोदी पोस्ट करत म्हणाले. पण मोदींच्या या ट्विटने पाकिस्तानला जबरदस्त मिरची लागली आहे.
नकवींनी केले ट्विट
संतप्त नकवींनी यावर प्रत्युत्तर देत, मोदींवर क्रीडा भावनेचा अपमान केल्याचा आरोप केला. नक्वी यांनी एक्सवर खोटे दावे करत म्हटले आहे की, ‘जर युद्ध आपल्यासाठी अभिमानाचा विषय असेल तर, इतिहासात पाकिस्तानचा अनेक वेळा विजय झाला आहे. कुठलाही क्रिकेट सामना सत्य बदलू शकत नाही. खेळात युद्ध आणणे, हे आपण किती आधीर आहात हे दर्शवते.”
अमित शाहांनी केले अभिनंदन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. एक अद्भुत विजय. आमच्या मुलांच्या प्रचंड उर्जेने पुन्हा एकदा विरोधकांना पराभूत केले आहे. मैदान कोणतेही असो, भारत जिंकणारच हे निश्चित आहे, असे अमित शाह म्हणाले.
पाकिस्ताच्या संरक्षण मंत्र्यांचा तीळपापड
पीएम मोदींचा हा शुभेच्छा संदेश पाकिस्तानच्या खूप जिव्हारी लागला. भारताविरोधात नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणारे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना शांतता आणि समाधान आठवले. “मोदी उपखंडात क्रिकेटची संस्कृती आणि भावना नष्ट करत आहेत. त्यांनी शांतता आणि समस्यांवर तोडगा काढण्याच्या शक्यता संपवल्या आहेत” असे ख्वाजा आसिफ यांनी एक्सवर लिहिलय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




