Tuesday, October 22, 2024
Homeनगरयंदा विधानसभेमुळे शेतकर्‍यांचा ऊस खाणार भाव

यंदा विधानसभेमुळे शेतकर्‍यांचा ऊस खाणार भाव

निवडणूक काळात गाळप होणार असल्याने वाढीव दराची अपेक्षा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यातील प्रमुख पीक असलेला ऊस गळीत हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. सोबतच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून प्रशासकीय आणि राजकीय पक्षांच्या पातळीवर निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, 15 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू होणार असून याच दरम्यान विधानसभा निवडणूका होणार असल्याने यंदा शेतकर्‍यांच्या ऊसाला चांगला भाव मिळणार आहे. यामुळे राज्यातील सामान्य मतदारांप्रमाणे ऊस उत्पादक जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण करणार्‍यांना यंदाच्या विधानसभेत मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात विशेष करून पुणे, सोलापूर, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर साखर कारखानदारांनी विधानसभेच्या आखाड्यात शड्डू ठोकला आहेत. निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय ऊस दर घोषणा होईल आणि आपल्याला वाढीव दर मिळेल, या आशेवर शेतकरी बसला आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळे यंदा ऊस कमी असून कारखानेही जवळपास एक महिना उशिरा सुरू होत असल्याने उसाची रिकवरी किमान एक टक्कापर्यंत वाढणार आहे. गेल्या वर्षीचा हंगाम 20 ऑक्टोबर रोजी सुरू झाला होता. मात्र यंदा सुरू असलेला पाऊस आणि विधानसभा निवडणूक यामुळे यंदाचा हंगाम हा जवळपास एक महिना उशिरा म्हणजे 15 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. एक महिना उशीर झाल्याने उसाची रिकवरी वाढली तर 10.15 टक्क्यांपुढील साखर उतार्‍यावर जादाचे पैसे उत्पादक शेतकर्‍यांना द्यावे लागणार आहे. तसेच सध्याची 3 हजार 400 रुपये असणारी एमएसपी वाढवण्याच्या हालचाली जोरदार सुरू झाले असून ही एमएसपी आता 3 हजार 900 पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यात 23 सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचे मोठे जाळे आहे. मात्र, यातील किती साखर कारखाने सुरू होणार यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत वाट पाहवी लागणार आहे. सध्या कारखान्यांच्या गाळप परवाने काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील वर्षीच्या ऊसाला जिल्ह्यात सर्वाधिक भाव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा साखर कारखान्याने 3 हजार 200 जाहीर केलेला आहे. यामुळे इतर कारखाने अंतिम भाव काय देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यातच आता विधानसभा निवडणूक येत असल्याने आणि जिल्ह्यातील जवळपास सर्व मतदारसंघाच्या राजकारणात त्यात्या ठिकाणाचे साखर कारखाने राजकीय केंद्रबिंदू असल्याने यंदा साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना जास्तीजास्त भाव द्यावा लागणार आहे. यातून कारखाना कारखान्यांत स्पर्धा होवून यात ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा कसा फायदा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गाळपासाठी उपलब्ध ऊस
देशात 2022- 23 च्या पावसाळ्यात मोसमी पाऊस जेमतेम झाला होता. त्यामुळे 2023 मध्ये ऊस लागवडीखालील क्षेत्रात घट झाली होती. गेल्या वर्षी लागवड केलेला ऊस यंदा गाळपासाठी तयार झाला आहे. लागवड कमी झाल्यामुळे गाळपासाठी उसाची उपलब्धताही कमी आहे. गेल्यावर्षी सुमारे 59.44 लाख हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होता. यंदा सुमारे 56.04 लाख हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. उत्तर प्रदेशात 23.32 लाख हेक्टर, महाराष्ट्र 13.10 लाख हेक्टर, कर्नाटक 6.20 लाख हेक्टर, तमिळनाडू 2 लाख हेक्टर, गुजरात 2.31 लाख हेक्टर आणि देशाच्या उर्वरित राज्यात 9.95 लाख हेक्टर असे एकूण 56.08 लाख हेक्टरवरील उसाचा गाळप होणार आहे.

असे असेल साखर उत्पादन
अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (यूएसडीए) परराष्ट्र सेवा विभागाने भारतात 2024-25 मध्ये इथेनॉलकडे साखर वळविण्यापूर्वी एकूण 355 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. इंडियन शुगर मिल्स अ‍ॅण्ड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चर्स असोसिएसनने (इस्मा) देशात यंदाच्या गळीत हंगामात एकूण साखर उत्पादन 333 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय साखर उद्याोगातील जाणकार देशात यंदा 340 लाख टनांपर्यंत साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करीत आहेत. राज्यनिहाय विचार करता उत्तर प्रदेशात 113, महाराष्ट्रात 111, कर्नाटकात 56.11, तमिळनाडूत 8.84, गुजरातमध्ये 9.98 आणि देशाच्या उर्वरित राज्यांत 33.75 लाख टन, असे एकूण 333 लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे.

महाराष्ट्रातील साखर हंगाम
राज्यात यंदा साखर उत्पादनात सुमारे दहा लाख टनांनी घट होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी 110 लाख साखर उत्पादन झाले होते. यंदा 90 ते 102 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी सुमारे सात लाख टन साखरेचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी करण्यात आला होता, तर 110 लाख साखर उत्पादन झाले होते. यंदा 12 लाख टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्यात येणार असून, निव्वळ साखर उत्पादन 90 ते 102 लाख टन होण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, राज्यात यंदा 11.67 लाख हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. सरासरी प्रतिहेक्टर 86 टन उत्पादनाचा अंदाज आहे. लागवड, चारा, गुर्‍हाळघरे आणि रसवंतीसाठी उपयोग होणारा ऊस वगळून एकूण 904 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. सरासरी 11.30 टक्के उतारा मिळून एकूण 102 लाख टन साखर उत्पादन होईल. त्यापैकी 12 लाख टन साखरेचा वापर इथेनॉलसाठी होईल आणि निव्वळ साखर उत्पादन 90 लाख टन होईल. मिटकॉन या संस्थेने 102 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे.

देशातील साखर हंगामाची स्थिती
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्ये आहेत. कर्नाटक, महाराष्ट्रातील यंदाचा साखरेचा गाळप हंगाम 15 नोव्हेंबरपासून होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने अद्याप घोषणा केलेली नाही, तरीही दिवाळीनंतरच हंगाम सुरू होण्याचा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राने साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. त्याआधी उत्तर प्रदेश आघाडीवर होता. कर्नाटक तिसर्‍या क्रमांकावर आहे. गुजरात, तमिळनाडू, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल आदी राज्यांतही साखर कारखाने असले तरी एकूण उत्पादनात त्यांचा वाटा अल्प आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या