नाशिक | Nashik
विधानसभेच्या निवडणुकीत (Vidhansabha Election) मातब्बर उमेदवारांनाही (Candidate) पराभवाबरोबरच आपली ‘डिपॉझिट’ जप्त होण्याची नामुष्की सहन करावी लागली आहे. त्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, शिवसेना (उबाठा) चे अद्वय हिरे, गणेश धात्रक तर शरदचंद्र पवार रा. काँ. पक्षाच्या दीपिका चव्हाण यांना आपली अनामत रक्कम गमवावी लागली. त्यांच्यासह जिल्ह्यातील १६५ उमेदवारांचे डिपॉझिट या निवडणुकीत जप्त झाले असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील एकूण १५ विधानसभा मतदारसंघात (Constituency) यंदा १९६ उमेदवार रिंगणात उतरले. यात मालेगाव बाह्य, बागलाण व इगतपुरी या तीन ठिकाणी प्रत्येकी उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. बागलाणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा दारुण पराभव झाला. निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहुनही त्यांना आपले डिपॉझिट वाचविता आले नाही.
चांदवडमध्ये शिरीषकुमार कोतवाल यांच्यापेक्षा प्रहारचे उमेदवार गणेश निंबाळकर व अपक्ष केदा आहेर यांना अधिक मते मिळाली. तर इगतपुरीचे उमेदवार लकी जाधव आणि मालेगाव मध्य चे एजाज बेग यांचाही पराभव झाल्याने पक्ष आता शून्यावर आला आहे. विशेष म्हणजे या तिनही उमेदवारांना स्वतःची अनामत राखण्यात अपयश आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालेगाव बाह्यचे उमेदवार अद्वय हिरे व नांदगावचे गणेश धात्रक या दोघांनाही मानहाणीकारक पराभव सहन करावा लागला. हिरे तिसऱ्या तर धात्रक चौथ्या स्थानावर फेकले गेले. त्यांचेही डिपॉझिट जप्त करत शिवसेनेच्या उमेदवारांनी आपला वचपा काढला.
मनसेचे नाशिक पश्चिममधील उमेदवार दिनकर पाटील यांच्या व्यतिरिक्त प्रसाद सानप (नाशिक पूर्व), काशिनाथ मेंगाळ (इगतपुरी) व मोहिनी जाधव (देवळाली) या सर्वांची अनामत जप्त झाली आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अपक्ष रिंगणात उतरलेले केदा आहेर, बंडुकाका बच्छाव यांनी कडवी झुंज देत अनामत रक्कम तर वाचवली याशिवाय तिसऱ्या क्रमांकाची मते घेवून आपली राजकीय ताकदही दाखवून दिली. बागलाण व इगतपुरीतील सर्वाधिक प्रत्येकी उमेदवारांची तर कळवणमधील सर्वात कमी पाच उमेदवारांची अनामत रक्कम जमा झाली आहे.
असे ठरते डिपॉझिट
विधानसभा निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना दहा हजार रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना निवडणूक विभागाकडे पाच हजार रुपये जमा करावे लागतात. निवडणुकीत एकूण झालेल्या वैध मतांच्या एक षष्टमांश (१/६) मतांपेक्षा अधिकची मते मिळवणाऱ्या उमेदवारांना ही अनामत रक्कम परत मिळते. पण त्यापेक्षा कमी मतदान मिळालेल्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होते. पैशांपेक्षा निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणे हा मानहानीकारक पराभव समजला जातो.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा