सोनई (वार्ताहर)
श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानचा कारभार विश्वस्त मंडळ की, कार्यकारी समितीने पहायचा या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू होती. त्या प्रकरणाचा महत्वपूर्ण निर्णय दि. १२ डिसेंबर रोजी न्यायालयाने देत विश्वस्त मंडळाकडे देवस्थानचा कारभार पाहण्याचा निकाल दिला आहे. विश्वस्तांची मुदत डिसेंबर अखेर संपत असल्याने पुढील महिन्यात नवीन कारभारी येणार असल्याचे बोलले जात आहे.
विधीमंडळात भाजपचे आ. सुरेश धस व शिवसेना शिंदे गटाचे आ. विठ्ठलराव लंघे यांनी शनैश्वर देवस्थान मध्ये भ्रष्टाचार व अवैध नोकर भरती प्रश्नी आवाज उठवला होता. महाराष्ट्र सरकारने देवस्थानमध्ये झालेली अवैध नोकर भरती व येथे भ्रष्टाचार झाला असल्याप्रकरणी विश्वस्त मंडळ बरखास्त करून तेथील व्यवस्था पाहण्याकरिता अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची प्रशासक म्हणून २२ सप्टेंबर रोजी नियुक्ती केली, प्रशासक आशिया यांनी सुत्रे हाती घेऊन प्रशासकीय कार्यालयातील दप्तरे सील केली व येथील दैनंदिन व्यवस्था पाहण्याकरता ११ जणांच्या कार्यकारी समितीची स्थापना केली.
समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांची नियुक्ती प्रशासक आशिया यांनी केली. विश्वस्त मंडळाने या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत प्रशासक व कार्यकारी समितीच्या निवडीलाच आव्हान दिले. न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी पूर्ण होईपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने विश्वस्तांच्या बाजूने निकाल दिला आहे. विश्वस्त मंडळाच्या वतीने अॅड. सतीश तळेकर यांनी बाजू मांडली.
औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयाने विश्वस्त मंडळाच्या कामकाजावर शिक्कामोर्तब झाला आहे. विश्वस्त मंडळाने नियमाप्रमाणे आजपर्यंत कारभार केलेला आहे. आणि इथून पुढेही करणणार आहे, न्यायालयाने सरकार नियुक्त प्रशासक नियुक्ती नाकारलेली आहे, आणि पुन्हा विश्वस्त मंडळाला कामकाज करण्याचा आदेश दिलेला आहे. या निर्णयाने स्थानिक विरोधकांना मोठी चपराक बसली असून, त्यांनी सवंग लोकप्रियतेसाठी विनाकारणच बिनबुडाचे आरोप विश्वस्त मंडळावर केले होते. ते सर्व आरोप चुकीचे होते, ते आज सिद्ध झालेले आहे.
-आप्पासाहेब शेटे, विश्वस्त, शनैश्वर देवस्थान ट्रस्ट शिंगणापूर
नव्या वर्षात नवीन कारभारी
सध्याच्या विश्वस्तांची मुदत डिसेंबर अखेर संपत असल्याने जानेवारी महिन्यात नवीन विश्वस्त मंडळ येणार आहे. २०१८ च्या कायद्यानुसार राज्यातील कुणीही शनीभक्त येथे विश्वस्त होऊ शकतो, यापूर्वी फक्त गावातील रहिवासी असणाऱ्या व्यक्तीच विश्वस्त होत होते, या प्रकारची येथे जुनी घटना होती.




