औरंगाबाद – Aurangabad :
‘मी घरी बसून केलेल्या कामांचा शुभारंभ आणि भूमीपुजन आता होतेय. त्याची सुरुवात औरंगाबाद म्हणून झाली,’ असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाचा सुरुवातीलाच विरोधकांना लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजना व बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व सफारी पार्क तसंच अन्य योजनांचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
‘मला विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगानं करायचा आहे. फक्त भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाहीये. काम पूर्ण करायला आलोय,’ असं ठाम अश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादकरांना दिलं आहे.
तसंच, ‘आता आम्ही फक्त घोषणा करणार नाही. माझ्या कावडीने जर कोणाच्या घरात पाणी येत असेल, त्यांची तहान भागत असेल तर ते मोठं पुण्य आहे आणि ते मिळवायला भाग्य लागतं,’ असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.
‘फक्त भूमिपूजन करुन मी शांत बसणार नाही. मी कधीही, न सांगता न कल्पना देता या कामाची प्रगती बघायला येणार आहे. गेल्या आठवड्यातही समृद्धी माहामार्गाची पाहणी केली नागपूरपासून शिर्डीपर्यंतचा हा महामार्ग १ मेपर्यंत सुरू होतोय. नुसत्या घोषणा नाहीत,कामांना गतीही देतोय. गती नसेल तर त्याला काही अर्थ नसेल. हा महामार्ग झाल्यानंतर औरंगाबादचे महत्त्व आणखी वाढणार आहे,’ असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.