संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी लागते. सध्या देशात भाजपचे जे लोकशाही विरोधी राजकारण सुरू आहे ते जनतेच्या हिताचे नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी मित्रपक्ष बरोबर येत असतील तर त्यांना बरोबर घ्यायला पाहिजे, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
नवी दिल्ली येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय समितीच्या बैठकीकरीता ते उपस्थित होते. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. मनरेगा ही गोरगरीब जनतेच्या हाताला शाश्वत काम देणारी योजना आहे. या योजनेला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव दिले आहे. या योजनेतील गांधींचे नाव बदलले ही वृत्ती वाईट आहे. गांधी हे मानव धर्म सांगणारे आणि मानवासाठी आदर्श असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांचे नाव बदलण्याचा उद्देश काय हे कळत नाही.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ठरवलं तर गाव बदलण्याची ताकद त्यामध्ये होती. मात्र भाजप सर्वसामान्य माणसाचा विचार करत नसून पैशावर कोणीही विकत घेता येतो ही त्यांची विचारधारा आहे आणि अशा विचारधारेविरुद्ध लढताना समविचारी लोकांनी एकत्र आले तर त्यांना बरोबर घेतले पाहिजे असे ते म्हणाले. राज्यामध्ये नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या असून या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपने पैसा व सत्तेचा दुरुपयोग केला.
याउलट काँग्रेसने निर्भेळ यश मिळवले असून काँग्रेसचे यश हे लोकशाहीचे यश आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा असून त्याच्या बांधणीकरीता समविचारी पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन करताना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे पुरोगामी व गांधी विचारांचे असून ते योग्य निर्णय घेतील असेही ते म्हणाले.




