लासलगाव | हारून शेख Lasalgaon
गेल्या साडेतीन महिन्यांपासून भारतातून ठप्प झालेल्या कांदा निर्यातीला थोड्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. बांगलादेश सरकारने तेथील आयातदारांना भारतीय कांद्याच्या आयातीसाठी आयात परवाना देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात केवळ २०० मे.टन कांद्याच्या आयातीला परवानगी देण्यात आली असल्याचे वृत्त आहे.
भारतातील कांदा उत्पादनाची क्षमता बघता किमान पाच लाख मे.टन कांद्याची निर्यात होणे आवश्यक असल्याचे मत कांदा निर्यातदार व शेतकरी संघटना यांनी व्यक्त केले आहे. ही बाब काही प्रमाणात दिलासादायक असली तरी उत्पादक शेतकऱ्यांनी हुरळून जाण्याचे कारण नाही. जोपर्यंत केंद्र सरकार भारतीय निर्यातदारांना प्रोत्साहन देत नाही, तोपर्यंत कांद्याच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याचे जाणकार सांगितले.
बांगलादेश सरकारने १३ डिसेंबर२०२५ पर्यंत कांद्यावरील आयात बंदी हटवल्यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात चढ-उतार होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली होती अखेर या बांगलादेशातील कांदा आयात बंदी हटवल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.आज आणि उद्या दोन दिवसात दोनशे टनपर्यंत कांदा बांगला देशात पाठवण्यासाठी परवानगी देण्यात आली असून त्यानंतर मोठ्या प्रमाणात कांदा पाठवण्यासाठी परवानगी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे
उद्या स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने काही बाजार समिती शनिवारी आणि रविवारी बंद राहत असल्यामुळे बाजार भाव वाढीचे खरे चित्र सोमवारी स्पष्ट होणार आहे .
भारतातील एकूण कांदा निर्यातीपैकी ४०% हिस्सा बांगलादेशकडून खरेदी होतो. २०२४-२५ आर्थिक वर्षात ४.८० लाख मेट्रिक टन कांदा बांगलादेशला पाठवण्यात आला होता, ज्यातून १७२४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले.





