भंडारदरा, कोतुळ |वार्ताहर| Bhandardara
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात दोन दिवसांच्या काहिशा विश्रांतीनंतर काल शनिवारपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. परिणामी भंडारदरा आणि निळवंडेत पाण्याची आवक वाढल्याने दोन्हीही धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. काल सकाळी या धरणातून पाण्याचा विसर्ग 1991 क्युसेक होता. त्यानंतर घाटघर, रतनवाडी, पांजरे आणि भंडारदरा परिसरात पाऊस वाढल्याने सायंकाळी हा विसर्ग 5819 क्युसेक करण्यात आला.
सकाळी निळवंडेतून 3240 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी या धरणातून 10601 क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. या धरणात सध्या 8218(98.67टक्के) पाणीसाठा आहे. वाकी तलावही तुडूंब असल्याने 1297 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. आढळा पाणलाटोतही पाऊस सुरू असल्याने या धरणातूनही 236 क्युसेकने आवक सुरू आहे.
काल सकाळी संपलेल्या 24 तासांत पडलेला पाऊस असा-मिमी. भंडारदरा 29, घाटघर 30, पांजरे 40, रतनवाडी 27, वाकी 18.
कोतूळ वार्ताहराने कळविले की, काल दुपारपासून हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित व अन्य भागात पावसाची पुन्हा संततधार सुरू असल्याने नदीच्या पातळीत वाढ होत आहे. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 25126 दलघफू होता. मुळा नदीचा विसर्ग 3416 क्युसेक होता. मुळा धरणातून 1500 क्युसेकने मुळा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, रात्री पावसाचा जोर काहिसा वाढल्याने मुळा नदीच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.




