Saturday, July 27, 2024
Homeनगरभंडारदरा, मुळा पाणलोटात मान्सूनचे पुनरागमन

भंडारदरा, मुळा पाणलोटात मान्सूनचे पुनरागमन

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर|Bhandardara

नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा पाणलोटात कालपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक होऊ लागली आहे. या पावसामुळे पाणलोटातील भातासह अन्य पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच लाभक्षेत्रात दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

भंडारदरा धरण तुडूंब झाल्यानंतर गत दहा पंधरा दिवसांपासून या भागात मान्सून गायब झाला होता. त्यामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तशीच पिके जळू लागली होती. अशातच बुधवारी रात्रीपासून तुरळक पावसास सुरूवात झाली. त्यानंतर काल गुरूवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत होता. त्यामुळे काल दिवसभरात धरणात नव्याने 50 दलघफू पाणी आले होते. परिणामी 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल गुरूवारी सायंकाळी 10520 दलघफू (95.30 टक्के) साठा झाला आहे. काल दिवसभरात भंडारदरात पडलेल्या पावसाची नोंद 17 मिमी झाली आहे.

गायब झालेल्या पावसाचे मुळा पाणलोटातही आगमन झाले असून फारसा जोर नव्हता. कोतूळ येथे काल दिवसभर अधूनमधून सरी कोसळत होत्या. हरिश्चंद्र गड, आंबित व अन्य भागातही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. काल सकाळी कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 325 क्युसेक होता. पाऊस सुरू झाल्याने त्यात काहीशी वाढ झाली. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात काल सकाळी पाणीसाठा 21272 दलघफू (81.81 टक्के) होता.या धरणातून 1650 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या