गुवाहाटी | Guwahati
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत हे सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत. रास्वसंघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ते देशभर दौरा करत आहेत. दरम्यान, त्यांनी मंगळवारी (१८ नोव्हेंबर ) गुवाहाटी येथे बुद्धिजीवी, विद्वान, संपादक, लेखक व उद्योजकांसह प्रतिष्ठित लोकांच्या समूहाला संबोधित केले. ज्या व्यक्तीला भारताचा अभिमान वाटतो, ती प्रत्येक व्यक्ती हिंदूच आहे. असे त्यांनी म्हंटले आहे.
हिंदू धर्माची ओळख केवळ धार्मिक नसून ती एक सभ्यतेची ओळख आहे. भारत आणि हिंदू एकच आहेत. भारत मूळतः ‘हिंदू राष्ट्र’च आहे. त्यामुळे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची वेगळी गरज नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले.
नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
भारताला हिंदू राष्ट्र होण्यासाठी कोणत्याही अधिकृत घोषणेची आवश्यकता नाही
मोहन भागवत म्हणाले, “भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची गरज नाही. भारताच्या संस्कृतीतून आधीच हिंदू राष्ट्राचे प्रतिबिंब दिसते. हिंदू धर्म हा केवळ एक धार्मिक शब्द नाही तर हजारो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेत रुजलेली एक सभ्यतेची ओळख आहे. भारत आणि हिंदू हे समानार्थी आहेत. भारताला ‘हिंदू राष्ट्र’ होण्यासाठी कोणत्याही अधिकृत घोषणेची आवश्यकता नाही. भारताची सभ्यता हेच त्याचे प्रमाण आहे.”
रास्वसंघ नेमकं काय आहे?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मूळ तत्वज्ञान स्पष्ट करताना सरसंघचालक म्हणाले, “ही संघटना कोणाचाही विरोध करण्यासाठी, कोणाचेही नुकसान करण्यासाठी, कोणालाही कुठलीही इजा पोहोचवण्यासाठी नव्हे तर एक प्रगत समाज व व्यक्ती निर्माण करण्यासाठी सुरू झाली आहे. वैयक्तिक चारित्र्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी व भारताला विश्वगुरू बनवण्यात योगदान देण्यासाठी ही संघटना उभी राहिली आहे. विविधतेत भारताला एकत्र आणण्याची पद्धत म्हणजे संघ (RSS),” असेही भागवत यांनी रोखठोकपणे सांगितले.
तरच घुसखोरीला आळा बसेल
आसाममधील लोकसंख्या बदलांबद्दलच्या चिंता दूर करण्यासाठी मोहन भागवत यांनी आत्मविश्वास, दक्षता आणि स्वतःच्या भूमी आणि ओळखीबद्दल दृढ आसक्ती बाळगण्याचे आवाहन केले. त्यांनी बेकायदेशीर स्थलांतर, हिंदूंसाठी तीन मुलांचा आदर्श यासह संतुलित लोकसंख्या धोरणाची आवश्यकता आणि फुटीर धार्मिक धर्मांतरांना विरोध करण्याचे महत्त्व यासारख्या मुद्द्यांवर भाष्य केले. आपण आत्मविश्वास ठेवण्यासोबत दक्षता बाळगली पाहिजे. तसेच आपली जमीन आणि संस्कृती याच्याशी आसक्ती राखली पाहिजे असे ते म्हणाले. समाजातील सर्व घटकांनी निःस्वार्थपणे एकत्र काम केले पाहिजे, तरच या घुसखोरीला आळा बसेल, असेही ते म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




