मुंबई | Mumbai
अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसने केलेली युती राज्यात चर्चेत ठरली आहे. येथील सत्ताधारी भाजपला काँग्रेस नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावरुन पाठिंबा दिला होता. त्यावरुन, सुरू झालेल्या राजकीय वादानंतर अखेर अंबरनाथ नगरपालिकेत मोठी घडामोड घडली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत या सर्वांनी भाजपचे कमळ हाती घेतले. या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला.
दर्शना पाटील, अर्चना पाटील, हर्षदा पाटील, तेजस्विनी पाटील, प्रदीप पाटील, विपुल पाटील, कबीर गायकवाड, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजिवनी देवडे, दिनेश गायकवाड आणि किरण राठोड हे १२ नगरसेवक काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप नेते तसेच मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. संजीव नाईक आणि दीपक म्हात्रे यावेळी उपस्थित होते.
सत्तेसाठी नाही तर, विकासासाठी
बुधवारी (8 जानेवारी) सकाळी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या शहराध्यक्षांसह ११ नगरसेवकांनी रात्री उशिरा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ही घोषणा केली. हे नगरसेवक सत्तेसाठी नाही तर, विकासासाठी आमच्याबरोबर आले असल्याचा दावा यावेळी रवींद्र चव्हाण यांनी केला. “जनतेने तेथील नगरसेवकांना निवडून दिले होते. त्यांनी जनतेला विकासाचे आश्वासन दिले होते. सरकार गतीमान पद्धतीने काम करत असल्याने जनतेला न्याय देता येईल, यामुळे हे नगरसेवक पक्ष प्रवेश करत आहेत,” असे रवींद्र चव्हाण म्हणाले. काँग्रेसचे सर्व नगरसेवक, महिला आघाडी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसकडून नगरसेवकांवर कारवाई
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आपण निवडणूक लढविली असून आपल्या पक्षाचे १२ सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र, आपण प्रदेश कार्यालयास कोणतीही माहिती न देता अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन केल्याचे प्रसार माध्यमांद्वारे कळाले. ही बाब अत्यंत चुकीची असून पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे. ही बाब लक्षात घेता प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून आपणास काँग्रेस पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे. तसेच आपली ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आपल्या सोबत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांना सुध्दा पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे, असे पत्रच काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी प्रमोद पाटील यांना पाठवले होते. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी नवनिर्वाचित तब्बल ११ काँग्रेस नगरसेवकांच्या गटाने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने २६ जागा जिंकल्या होत्या. यावेळी, भाजपने १४ जागांवर विजय मिळवला होता. पण, अंबरनाथ नगरपरिषदेत शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी भाजपने मोठी खेळी केली. त्यांनी यावेळी वेगळ्या विचारधारेच्या काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अंबरनाथ विकास आघाडीची स्थापना केली. यामध्ये भाजपचे १४, काँग्रेसचे १२, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आणि एक पक्ष अशा ३१ नगरसेवकांचा समावेश होता. पण, काँग्रेसच्या याच १२ नगरसेवकांना भाजपसोबत जाण्याचा निर्णय महागात पडला. काँग्रेसने या १२ नगरसेवकांची हकालपट्टी केली. पण, त्यानंतर अंबरनाथचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह १२ नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.




