नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आला असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत एकीकडे भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि दुसरीकडे राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेस अशी महाआघाडी आणि आणखी काही स्थानिक पक्ष अशी लढत पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वीच या निवडणुकीत आता सत्ताधारी विरुध्द विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव त्यांची पत्नी राबडी देवी आणि पुत्र तेजस्वी यादव यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दिल्लीतील राउज ॲव्हेन्यू न्यायालयाने विशेष सीबीआय न्यायालयाने आयआरसीटीसी घोटाळा आणि नोकरीसाठी जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात तिघांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, १२० आणि पीसी कलमांतर्गत आरोप निश्चित केले आहे. हे प्रकरण रांची आणि पुरी येथील आयआरसीटीसी हॉटेलच्या टेंडर वाटपातील गैरव्यवहाराशी संबंधित आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता लालू कुटुंबीयांवरील खटला औपचारिकरित्या सुरू होणार आहे. लालू प्रसाद यादव हे आरोग्याच्या कारणांमुळे व्हीलचेअरवर कोर्टात दाखल झाले, तर हे प्रकरण बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडले असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
या प्रकरणाबाबत न्यायालयात सोमवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर न्यायालयाने लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि राबडी देवी यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले. यावेळी न्यायालयाने नमूद केले की, ‘संबंधित नेते षड्यंत्र रचण्यात सहभागी होते आणि सार्वजनिक सेवक म्हणून त्यांच्या पदाचा गैरवापर करत होते.’
२४ सप्टेंबर रोजी न्यायालयाने सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेश दिले होते. दोन्ही प्रकरणांमधील युक्तीवाद पूर्ण झाले आहेत. न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणांमधील निकालाचा आगामी बिहार विधानसभा निव़डणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीआहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





