Saturday, July 27, 2024
Homeनगरभाजप विरोधात काँग्रेसची एक हजार गावात जागृती

भाजप विरोधात काँग्रेसची एक हजार गावात जागृती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्रातील भाजप सरकारच्या अन्यायकारक धोरण, भ्रष्टाचार, लोकशाहीची गळचेपी व सत्तेचा गैरवापर या विरोधात जनसमानसामध्ये जागृती निर्माण करण्याचे हेतूने प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून राज्यभर जनसंवाद पदयात्रा काढली जाणार आहे. या पदयात्रेचा उत्तर महाराष्ट्र विभागातील शुभारंभ 4 सप्टेंबरला अहमदनगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यापासून विधिमंडळ पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 1 हजार गावापर्यंत ही जनसंवाद पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.

- Advertisement -

जिल्हा काँग्रेसच्यावतीने जनसंवाद पदयात्रेचे नियोजन करण्यासाठी आयोजित केलेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. बैठकीस आमदार लहू कानडे, प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे व जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना नागवडे पुढे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील 146 पंचायत समितीचे गण विचारात घेऊन प्रत्येक पंचायत समिती गणात असणार्‍या मंडल काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत जनसंवाद पदयात्रा काढण्याचे काम मंडल काँग्रेसचे पदाधिकारी करणार आहेत.

या जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून लोकांच्या विविध प्रश्नांची मांडणी करणार्‍या कॉर्नर सभाचे आयोजन यानिमित्ताने केले जाणारे असून भारतीय जनता पार्टीचे सरकारची शेतकरी विरोधी धोरणाबाबतची भूमिका या निमित्ताने मांडण्यात येणार आहे. प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ यांनी जनसंवाद पदयात्रेची भूमिका स्पष्ट केली. या माध्यमातून प्रत्येक गावात स्वतंत्र पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या गटाच्या ठिकाणी मोठ्या बाजारपेठेच्या गावात पदयात्रा व सभेचे आयोजन करण्यात येणार आहे, तर तालुक्याच्या ठिकाणी तालुका पातळीवर काँग्रेसच्या सर्व संघटना एकत्र येऊन प्रत्येक तालुक्यात 3 ते 13 सप्टेंबर या दहा दिवसाच्या काळात पदयात्रा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.

आ. लहू कानडे याप्रसंगी म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या गेल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीच्या बाबत शेतकरी विरोधी घेतलेल्या धोरणाबाबत वाढलेल्या महागाईमुळे सामान्य माणसाचे झालेले हाल तर शेतकर्‍याच्या कांद्याच्या प्रश्नापासून तर विविध प्रश्नांबाबत केलेले अन्यायकारक निर्णय या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात मांडण्याचे काम काँग्रेसचा कार्यकर्ता करणार असून या जनसंवाद यात्रेमध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आव्हान आ. कानडे यांनी केले.

याप्रसंगी धर्मनाथ काकडे, बाळासाहेब आढाव, नासिर शेख, अरुण म्हस्के, अरुण पाटील नाईक, समीर काझी, शिवाजी नेहे, भानुदास बोराटे, संभाजी माळवदे, प्रकाश पगारे, शोभा पातारे मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. बैैठकीसाठी प्रशांत दरेकर, कार्लस साठे, रंजन जाधव, विष्णुपंत खंडागळे, शहाजीराजे भोसले, संदीप पुंड, रिजवान शेख, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मोहसीन शेख, प्रवीण गीते, अज्जू शेख, प्रकाश शेलार, संभाजी माळवदे, संजय पगारे आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या