नाशिक | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीने प्रकाशित केलेल्या कुंभ पर्वातील अमृत वचननाम्याच्या माध्यमातून नाशिक शहराला विकास उपक्रमांव्दारे शास्वत विकासाकडे नेत असल्याचे प्रतिपादन भाजपा नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल केदार यांनी केले.
भाजपा अमृत वचन नाम्याच्या प्रकाशनप्रसंगी त्यांनी सांगितले अमृत कुंभवचन नामा म्हणजे भारतीय जनता पार्टीचे लोकाभिमुख धोरण सुशासनाचा आग्रह आणि विकासाची ठोस दृष्टी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील व महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील अनेक लोक कल्याणकारी योजना नाशिक शहराच्या विकासासाठी राबविल्या गेलेल्या आहेत.
पंतप्रधान आवास योजना असो किंवा स्मार्ट सिटीचे उपक्रम असो यामुळे नाशिक महानगर हे अधुनिक व सक्षम शहर म्हणून पुढे जात आहे. आ. देवयानी फरांदे यांच्या मतदार संघात ३५० कोटीहून अधिक रुपयांची विकास कामे झाली. आ. सीमा हिरे यांच्या मतदार संघात ३०० कोटीहून अधिक रुपयांची विकास कामे झाली, आ. राहुल ढिकले यांच्या मतदार संघात धार्मिक व सांस्कृतिक केंद्रांची ३०० कोटीहून अधिक कामे पुर्णत्वास नेली आहे. यावेळी आ. सीमा हिरे, राहुल ढिकले, महानगर सरचिटणीस सुनिल देसाई, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, काशिनाथ शिलेदार, पियुष अमृतकर, राजेंद्र दराडे उपस्थित होते.
जाहीरनाम्याची संकल्पनाच बदलली
आजपर्यंत कोणत्याही निवडणुकीत वचननामा व जाहीरनामा प्रसिद्ध होतो तेंव्हा आपला पक्ष ५ वर्षांत काय काय करणार हे जाहीर करत असतो. मात्र यंदा भाजपने जो अमृत क्चननामा प्रसिद्ध केला त्यात मात्र सिंहस्थाचा अजेंडा जाहीर केला आहे आणि आमदारांच्या निधीतून काय काय कामे झालीत हे जाहीर केले आहे. त्यामुळे जाहीरनाम्याची संकल्पनाच बदलून गेली आहे.
कुंभमेळा हा भाजपचा मुख्य अजेंडा
कुंभ पर्वातील अमृतवचन या भाजपच्या वचननाम्यात आमचा संकल्प आहे की आगामी कुंभ मेळ्याच्या दृष्टीने देशभरामधून येणार्या साधू संत महंत यांना सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. साधू संत महंत यांच्यामुळेच कुंभ मेळा यशस्वी होणार आहे. त्यामुळे रामकाल पथ हा महत्वाचा विषय असो, साधू संत महंत यांच्याकरिता आरक्षित पुरेशी जागा असो, की त्यांच्याकरीता प्राथमिक गरजा, सोयी, सुख सुविधा असो सर्व कामे प्रामुख्याने भाजपच्या अजेंड्यावर रहाणार असल्याचे महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले.




