छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख याने संयमित पण तितक्याच खणखणीत शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ‘लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावे मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही’, असे रितेश देशमुख याने म्हटले आहे. रितेशने मंगळवारी सकाळी सोशल मीडियावरुन यासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतर आज रविंद्र चव्हाण छ. संभाजीनगरमध्ये असताना त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
लातूर शहरामधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, असे वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नवीन वाद ओढावून घेतला. ते काल लातूर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. सभेत बोलताना त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच वाद पेटला आहे. काँग्रेसने या वक्तव्याप्रकरणी चव्हाण यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर आमदार अमित देशमुख यांनी या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
रवींद्र चव्हाणांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता म्हणाले की, मी विलासराव देशमुख यांच्यावर कोणत्याही पद्धतीची टीकाटिप्पणी केली नाही. विलासराव हे मोठे नेते होते. मुख्यमंत्री म्हणून काम केलंय. मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या काँग्रेस पक्षाचा अजेंडा हा पूर्णच्या पूर्ण विलासरावांच्या भोवती केंद्रित झालेला दिसत आहे. काँग्रेस पक्ष हा आताही विलासरावांकडे पाहून आपण मतदान करावं, विलासरावांना घेऊन मतदान करावं. विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागत आहे, असा दावा चव्हाण यांनी केला.
विलासरावांवर कोणतीही टीक टिप्पणी केलेली नाही. विलासराव फार मोठे नेते होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. माझ्या त्या वक्तव्याकडे राजकीय दृष्ट्या पाहू नका. त्यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या चिरंजीवांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. लातूरकरांची माफी मागणार का, असे विचारले असता, रवींद्र चव्हाणांनी हा प्रश्न टाळत पुढील प्रश्न.. असे म्हटले. त्यानंतर पत्रकारांनी पुन्हा एकदा विलासराव देशमुखांबद्दल तुम्ही केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागणार का, असे विचारले असता रवींद्र चव्हाण यांनी नमस्कार करत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.




