मुंबई | Mumbai
मुंबई महापालिकेसह २९ महापालिकांची निवडणूक १५ जानेवारीला पार पडणार आहे तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटपाचे घोडे अद्याप अनेक ठिकाणी अडले आहे. राज्यात काही ठिकाणी महायुती म्हणून भाजप-शिंदे शिवसेना निवडणुकांना सामोरे जाणार आहे. मात्र, मुंबईतील महायुतीचे जागावाटप कसे होणार याचा पेच अद्याप कायम आहे. भाजप शिंदे गटातील काही जागांसाठीचा पेच अद्याप कायम आहे. पण, भाजपा १२९ तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ७९ जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेना शिंदेंची महायुती झाली आहे. पण दोन्ही पक्षांतील संपूर्ण जागावाटप अद्याप झालेले नाहीये. भाजप १२९ जागांवर तर शिंदे ७९ जागांवर लढण्यास तयार झाले आहे. मात्र २० जागांवर तोडगा निघणं बाकी आहे. जो आज निघेल अशी शक्यता आहे. अजित पवारांचा पक्ष स्वतंत्र लढणार आहे. मात्र अजित पवारांचा पक्ष १०० जागा लढवणार असल्याची माहिती आहे.
विधानसभेप्रमाणे १० ते १५ जागांवर उमेदवारांची देवाणघेवाण करून भाजप उमेदवारांना शिंदेसेनेतून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. भाजपने १०० हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, उद्धवसेना व मनसेचे आव्हान असल्याने भाजपचा प्रस्ताव स्वीकारून जागा पदरात पाडणे व युतीतच निवडणूक लढणे हेच पर्याय शिंदेसेनेसमोर आहेत.
आमच्या संयुक्त बैठकीत प्रचाराचे मुद्दे, नेत्यांच्या सभा, जागावाटपाची चर्चा झाली. समोर येणारा उमेदवार कोण व कोणत्या पक्षाचा आहे. तेथील पक्षीय समीकरणे व स्थानिक परिस्थिती पाहून अंतिम निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होऊन लवकरच तोडगा निघेल असे मुंबई शहराध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले.
राहुल शेवाळे म्हणाले, “२२७ जागांवर महायुतीचे उमेदवार लढणार आहेत. तसेच आम्ही १५० हून अधिक जागा जिंकून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मुंबईत महायुतीचा महापौरच होईल. शिवाय जागावाटप आणि वाटाघाटी या दोन्ही पक्षांचा सन्मान राखूनच होईल” असे राहुल शेवाळेंनी म्हटले आहे.
कसे असणार आहे जागावाटप?
भाजपा १२८ जागा, शिवसेना ७९ जागा अशा २०७ जागांवर एकमत झालेला आहे. उर्वरित २० जागांची चर्चा सुरू असून राष्ट्रीय पातळीवर चर्चा होऊन घडलेल्या विविध जागांचा तोडगा काढण्यात येईल. समोर उमेदवार कोण आहे याचा विचार करून उर्वरित जागांवर भाजपा लढणार की शिवसेना लढणार याचा निर्णय घेऊ, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली. मुंबई शहराचा रंग बदलणाऱ्या शक्तींना पराभूत करण्यासाठी आमची महायुती तयार आहे, सर्व मित्र पक्षांना समाधानकारक जागा देण्यात येतील. कोण किती जागा लढणार हे महत्वाचे नाही, वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन यादी जाहीर करू असेही अमित साटम यांनी म्हटले. दुसरे लोक काय करतात यावर आमचे निर्णय ठरतील. तर, निवडणुकीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या एकत्रित सभा होणार आहेत. त्यासाठी, १ किंवा २ तारखेपासून प्रचाराला सुरुवात होईल असेही स्पष्ट करण्यात आले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





