अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील देहरे येथे बस व दुचाकीचा अपघात झाला होता. यात रितेश खजिनदार (20 वर्ष) युवकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संतप्त नागरिकांनी मंगळवार सकाळपासूनच देहरे येथे देहरे, विळद, शिंगवे, नांदगाव ग्रामस्थांनी अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावर ठिय्या दिला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अडीच तास ठप्प झाली होती. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अधिकार्यांनी तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येतील असे आश्वासन दिल्याने रास्तारोको मागे घेतला.
अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे आत्तापर्यंत शेकडोजणांचा मृत्यू झाला आहे. वारंवार मागणी करुनही रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नाहीत. देहरे येथील पोलिस पाटील यांचा मुलगा खजिनदार दुचाकीवरुन जात असतांना बसने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शेकडोजणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्याचे काम सुरु करण्याच्या मागणीसाठी आणि रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी देहरे, विळद, शिंगवे, नांदगाव, जेऊर येथील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी सकाळी रस्त्याचे काम सुरु होत नाही तोपर्यंत रास्तारोको आंदोलन केले.
दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अधिकार्यांनी अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजविले जातील असे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले. यावेळी सरपंच जालिंदर कदम, राजकुमार आघाव, व्ही. डी. काळे, विश्वास जाधव, अनिल चोर, महेंद्र कोळपकर, प्रकाश लांडगे, विठ्ठल पठारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
20 वर्षांपासून भुयारी मार्ग रखडला
देहरे गावाच्या मधून अहिल्यानगर-मनमाड महामार्ग गेला आहे. तसेच येथून रेल्वे लाईनही गेलेली आहे. महामार्गालगत दोन्ही साईटला गाव असल्यामुळे भुयारी मार्ग करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. गेल्या 20 वर्षापासून भुयारी मार्ग रखडला आहे. प्रशासनाला अजून किती बळी हवे आहेत. असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.





