नवी दिल्ली | New Delhi
हवामानाचा लहरीपणा, नापिकी, शेतमालाला मिळणारा कमी भाव आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून कर्जाच्या वाढत जाणाऱ्या डोंगराखाली दबलेल्या बळीराजाला केंद्रातील मोदी सरकारनं दिवाळीआधीच गोड बातमी दिली आहे. सरकारने ६ रब्बी पिकांसाठी एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमत वाढवली आहे. मंत्रिमंडळाने एमएसपी २% वरून ७% पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाला सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली.
गहू आणि मोहरीसह ६ पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गहू, जौ, हरभरा, मसूर, सूर्यफूल आणि मोहरी या मुख्य रब्बी पिकांचे एमएसपी वाढवण्यात आले असून मसूर आणि मोहरीच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. गव्हाची किमान आधारभूत किंमत १५० रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. याशिवाय मोहरीची किमान आधारभूत किंमत ४०० रुपये करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाबद्दल माहिती देताना म्हटले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड पटीने वाढवणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तेलबिया आणि मोहरीच्या भावात प्रति क्विंटल २०० रुपये, मसूर ४२५ रुपये, गहू १५० रुपये, जौ ११५ रुपये, हरभरा १०५ रुपये, आणि सूर्यफुलाला प्रतिक्विंटल १५० रुपयांचा अधिकचा दर मिळणार आहे.