नवी दिल्ली | New Delhi
केंद्र सरकारने (Central Government) दीर्घकाळापासून सुरू असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीची दखल घेत ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला (Marathi Language) अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. पंरतु, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या निर्णयाचा शासन आदेश तीन महिने झाले तरी निघाला नसल्याने या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यानंतर अखेर आज केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन निर्णय काढला असून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते राज्य सरकारमधील मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन निर्णय स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार मानले.तसेच यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सामंत म्हणाले की, “हा एक अनोखा योगायोग आहे. ११ वर्षांपूर्वी, जेव्हा हा प्रस्ताव पाठवला गेला, तेव्हा मी मराठी भाषेचा राज्यमंत्री होतो. आज, अभिजात भाषेसाठीचा शासन आदेश (GR) हाती मिळाला तेव्हा मी मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे काही लाभ मिळतात, ते मिळवण्यासाठी आम्ही तातडीने प्रस्ताव सादर करणार आहोत, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळात मराठा भाषेचा कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर हा शासन निर्णय माझ्या हातात आणण्याचे भाग्य नियतीने लिहून ठेवलेले होते. म्हणून आता आमची जबाबदारी वाढलेली आहे, असे मला वाटते. तसेच या जबाबदारीने काम करून मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन केवळ महाराष्ट्रातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे केले जाईल, यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या शासन आदेशाच्या आगमनाला खास महत्त्व आहे”,असेही उदय सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, देशातील तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर, अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी आपली मराठी भाषा ही आता देशातील ७ वी भाषा ठरली आहे.२००४ मध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली होती. त्यानंतर २००५ मध्ये संस्कृत, २००८ मध्ये कन्नड आणि तेलुगू, २०१३ मध्ये मल्याळम आणि २०१४ मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.