चांदा |वार्ताहर| Chanda
नेवासा तालुक्यातील चांदा येथील गावठी कट्ट्यातून गोळीबारामुळे मयत झालेले शाहिद राजमहमद शेख यांच्या हत्याप्रकरणी सोनई पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून शेळी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील उधारीवरून वाद झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत शाहिद शेख याचा चुलतभाऊ यासीन इब्राहिम शेख (वय 39) यांनी सोनई पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले की, शाहिद शेख हा शेळी-बोकड विक्रीचा व्यवसाय करत होता. त्यामध्ये अक्षय बाळू जाधव यांचेकडे शेळी-बोकड विक्रीचे 25 हजार रुपये बाकी होते. पैसे परत मिळण्यासाठी शाहिद शेख यांनी अक्षय जाधव यांच्याकडे गत महिन्यातच पैशाची मागणी केली होती. त्यावेळीही त्यांच्यात मोठा वाद झाला होता.
काल सुरज लतीफ शेख यांच्या शेतात कंदुरीचा कार्यक्रम होता. तेथे बोकड कापण्यासाठी शाहिद शेख याला बोलवण्यात आले होते. तेथे गेल्यानंतर सायंकाळच्या सुमारास शाहिद शेख, सुरज लतीफ शेख, अक्षय बाळू जाधव यांच्यात वाद सुरू झाले. वाद एवढे विकोपाला गेले की शाहिद शेख याच्या छातीवर गोळ्या झाडण्यात आल्या. ही माहिती आपल्याला मिळताच आपण घटनास्थळी गेलो. तेथे पाहिले असता शाहिद शेख याच्या छातीवर गोळ्या झाडलेल्या दिसल्या. तो त्याच ठिकाणी गतप्राण झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आपण सोनई पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन अॅम्ब्यूलन्स मध्ये शाहिद शेख याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नगर येथील रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानुसार सोनई पोलिसात सुरज लतीफ शेख व अक्षय बाळू जाधव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 3,5 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी हे करत आहेत. दरम्यान सोमवारी सकाळी अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन न करता संभाजीनगरला शवविच्छेदन करण्याचा निर्णय झाल्याने शाहिदचा मृतदेह संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.




