Tuesday, September 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेने एवढ्याच जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात - भुजबळ

विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेने एवढ्याच जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात – भुजबळ

महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही गट वेगवेगळा वर्धापन दिन साजरा करत आहेत. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मुंबईत तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा अहमदनगर येथे वर्धापन दिन सोहळा होत आहे. यावेळी मुंबईमधील षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पक्षाचे जेष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विविध विषयांवर रोखठोक मतं मांडत आगामी विधानसभेच्या महायुतीमधील (Mahayuti) जागावाटपाबाबत मोठे विधान केले आहे.

यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “विधानसभेचे जागा वाटप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला (Shivsena) जेवढ्या जागा दिल्या जातील तितक्याच जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या गोष्टींचा फटका आपल्या पक्षाला बसला त्या चुकांमध्ये सुधारणा करून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. लोकसभेसारखे महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांनी किती जागा लढवायचा याचा निर्णय तातडीने घेतला पाहिजे. विधानसभेच्या निवडणुकीत जागा वाटपांच्या चर्चेचे ‘गुऱ्हाळ’ शेवटपर्यंत चालविता येणार नाही”, असेही भुजबळांनी स्पष्ट केले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “निवडणुकीच्या प्रचारात तसेच जाहीर सभांमध्ये बोलताना आपण पुरोगामी महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकर यांच्या मार्गाने जात असल्याचे नेहमी सांगतो. पंरतु, आम्ही त्याच विचाराचे असून प्रत्यक्षात त्याच मार्गाने जात असल्याचे आपल्याला सर्वांना दाखवून द्यावे लागेल. याकरिता अल्पसंख्याक, मुस्लिम यासह इतर समाजातील नेत्यांना एकत्र घेत त्या समाजाचे उमेदवार देण्याचे काम करावे लागेल, असेही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले. तसेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत ६० ते ८० जागा मिळाव्यात, अशी मागणी केली होती. तर आपल्या लोकांनी लगेचच तुम्ही शांत बसा अशी भूमिका घेतली. त्यामुळे ही भूमिका योग्य नसून आपल्या पक्षाला विधानसभा लढविण्यासाठी जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा विचार करावा”, असेही भुजबळ यांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या