अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
छत्रपती संभाजीनगर महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar Highway) शनिवारी रात्री झालेल्या पावसानंतर रविवार (दि.14) रोजी भल्या पहाटेपासून इमामपूर घाटामध्ये (Imampur Ghat) वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याचे पहावयास मिळाले. या ठिकाणी नादुरुस्त वाहने रस्त्यावर लावल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एमआयडीसी पोलीस (MIDC Police) व महामार्ग पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुमारे आठ ते दहा तासांचा कालावधी लोटला गेला. यामुळे नगरच्या दिशेने आणि नेवासा फाट्याच्या (Newasa) दिशाने काही किलो मीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभर वाहन चालक, एसटी महामंडळाने डोंगरगण, वांबोरी घाटा वापर केल्याने या ठिकाणी वाहनांची गर्दीच गर्दी होती.
रविवारी पहाटे इमामपूर घाट परिसरामध्ये दोन ते तीन कंटेनर नादुरुस्त झाल्याने रस्त्यावरच बंद पडले होते. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणार्या वाहनधारकांनी विरुद्ध दिशेने प्रवास करण्याचा प्रयत्न केला. त्यातच वाहतुकीची मोठी कोंडी झाली. रस्त्याच्या दुतर्फा सुमारे तीन ते चार किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे (MIDC Police Station) सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे व कर्मचार्यांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. अनेक रुग्णवाहिका व शासकीय वाहनांना देखील प्रवास करताना मोठी अडचण निर्माण झाली.
अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील (Ahilyanagar Manmad Highway) वाहतूक छत्रपती संभाजीनगर महामार्ग वरून वळविण्यात आल्याने या महामार्गावर मोठी वर्दळ पाहावयास मिळत आहे. महामार्गावरील खड्डे व झालेली दुरावस्था यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहने नादुरुस्त होतात. खड्ड्यांचा मोठा मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. इमामपूर घाटात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे महामार्गावरून प्रवास करणार्या सर्वच नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना देखील मोठी कसरत करावी लागली. महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून मनमाड महामार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजी नगर महामार्गावरून वळविण्यात आल्याने नागरिकांमधून नाराजी देखील व्यक्त करण्यात येत आहे. सुमारे आठ ते दहा तासाच्या आतक परिश्रमानंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. वाहतुकीच्या झालेल्या कोंडी बद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून मनमाड मार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजी नगर महामार्गावर वळविण्यात आली आहे. महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याची गरज असताना उलट महामार्गावर वर्दळ वाढली आहे. महामार्गा लगत अस्ताव्यस्त लावणार्या वाहनांवर देखील कारवाई करण्याची गरज असल्याचे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सोमनाथ हारेर यांनी सांगितले. तर घाटामध्ये नादुरुस्त झालेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. महामार्गावर मोठमोठाली खड्डे पडलेले असल्याने वाहने नादुरुस्त होत आहेत. वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागला. महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी इमामपूरचे सरपंच बाजीराव आवारे यांनी केली आहे.




