मुंबई | प्रतिनिधी Mumbai
महाराष्ट्रात निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना शनिवारी सन्मानित करण्यात आले. निवडणुकांचे यशस्वी आणि सुरळीत आयोजन केल्याबद्दल निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि राज्यांना विवधि श्रेणीत विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
येथील दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ सभागृहात भारत निवडणूक आयोगाच्यावतीने १५ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी राष्ट्रपती होत्या. याप्रसंगी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, डॉक्टर सुखभीर सिंग संधू उपस्थित होते.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या नेतृत्वात राज्याने निवडणूक व्यवस्थापनाचे सुक्ष्म नियोजन करून निवडणूक प्रक्रीया योग्य पद्धतीने राबविली. त्यांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. मतदारांच्या सहभागात वाढ करून त्यांचा मतदानाचा अनुभव अधिक सुलभ करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे विशेष कौतुक करण्यात आले. महाराष्ट्रासह जम्मू काश्मीर आणि झारखंड राज्यांनाही त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.
याशिवाय मुंबई जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी संजय यादव यांना मतदान केंद्रांवरील सुविधा केंद्रांचा दृष्टीकोन ठेवून विधानसभा निवडणुकांचे सुरळीत संचालन केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच,मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना मतदारांच्या योग्य प्रशिक्षणाची अंमलबजावणी आणि ई-व्होटिंगच्या माध्यमातून यशस्वी निवडणूक आयोजन केल्याबद्दल गौरवण्यात आले.