Friday, September 20, 2024
Homeनगर‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी

‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात येणारा ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम प्रभावीपणे आणि सामाजिक जाणिवेतून राबवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक समर्थ शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, नगरपालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त अभिजित हराळे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मोहिमेदरम्यान ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबवायचे आहेत.

या कालावधीत गावपातळीवरील कायमस्वरूपी अस्वच्छ असलेल्या जागा स्वच्छ कराव्यात. सर्व उपक्रमांचे गावपातळीवर योग्य नियोजन करावे. शहर किंवा गावात प्रवेश करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेला कचरा स्वच्छ करावा. कचरा निर्मितीच्या ठिकाणी वर्गवारी करून कचरा संकलित करावा. शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचविणार्‍या अस्वच्छ जागा स्वच्छ करण्यावर विशेष लक्ष द्यावे. 2 ऑक्टोबर 2024 रोजी स्वच्छता दिवस साजरा करण्यात येणार असून ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियानाअंतर्गत ग्रामस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत सफाई कामगारांची व त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या कुटुंबाची आरोग्य तपासणी करावी. सफाई कामगारांना किंवा त्यांच्या वारसांना देण्यात येणारे लाभ किंवा सुविधा देण्याबाबत मोहिमेत भर द्यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या.

‘या’ स्थळांची होणार स्वच्छता
सार्वजनिक ठिकाण, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यावसायिक व बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूक केंद्र, प्रमुख रस्ते आणि महामार्ग, पर्यटनस्थळे, रेल्वे स्थानके, धार्मिक, अध्यात्मिक स्थळे, प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट नाले स्वच्छ करण्यासाठी एक दिवस श्रमदान उपक्रम आयोजित करावा. त्यात एनएसएस, एनसीसी, बचत गट, ग्रामस्थ आणि शासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांचा सहभाग घ्यावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या