मुंबई | Mumbai
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष सुरू आहे. या निमित्ताने मुंबईत आरएसएसकडून दोन दिवसीय व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमावर अनेकांनी टीकाही केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे.
या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषिक आंदोलनांना ‘आजार’ संबोधले. ज्यानंतर राज ठाकरेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहन भागवतांना खडेबोल सुनावले आहेत. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर स्पष्ट शब्दांत पलटवार केला.
ज्यांना निमंत्रण मिळाले नाही म्हणून त्यांना वाईट वाटत आहे
मंगळवारी (ता. 10 फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, माझे तर अगदी स्पष्ट मत आहे की, ज्या लोकांना निमंत्रण मिळाले नाही, म्हणून त्यांना वाईट वाटत आहे. म्हणून ज्यांना निमंत्रण मिळाले, त्यांच्यावर टीका करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. १०० वर्षे पूर्ण झाल्याबाबत संघाच्या संदर्भात लोकांना वाद, अपवाद किंवा स्पष्ट माहिती मिळावी, लोकांच्या मनातील प्रश्न दूर व्हावेत. याकरिता समाजाच्या विविध क्षेत्रातील, विविध जाती-समाजाचे, विविध उद्योग क्षेत्रातील असे सगळे लोक निमंत्रित केले होते, असे फडणवीस यांनी सांगितले.
अनेकांना कोणाला तळमळ वाटते, कोणाला मळमळ होतेय
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आपण पाहिले असेल, तर बहुतांश लोक असे होते की, ज्यांचा कधीही संघाशी संबंध आलेला नाही. विशेषतः दोन दिवस माननीय, पूजनीय सरसंघचालकांनी केवळ मार्गदर्शन केले नाही, तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले. जी उत्तरे दिली आहेत, त्यामुळे संघविरोधी प्रचार करणाऱ्यांची दुकाने बंद होणार आहेत, यामुळे अनेकांना कोणाला तळमळ वाटते, कोणाला मळमळ होतेय, वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे अनेक लोक यावर बोलत आहेत. मला असे वाटते की, यासंदर्भात त्या सगळ्यांची असूया एवढीच असावी की, आम्हाला का बोलावले नाही, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
दोन दिवसीय कार्यक्रमात एकतर्फी चर्चा झाली नाही, दोन्ही बाजूंनी संवाद झाला. या कार्यक्रमात संघाच्या प्रकल्पांबाबत माहिती देण्यात आली. संघाबाबत असलेल्या काही समजुती, गैरसमज यांचे निराकरण करण्यात आले. सर्वांचे प्रश्न आणि शंका सरसंघचालकांनी ऐकून घेतले आणि उत्तरे दिली. असे कोणतेही संघटन नसेल, जे त्या संघटनेच्या विचारांशी सहमत नसलेल्या, संबंध नसलेल्या लोकांना निमंत्रणे देत असेल आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शंका-समाधान करत असेल. संपूर्ण जगात सर्वांत मोठ्या असलेल्या संघाचे प्रमुख अशी गोष्ट करत असतील, तर ती खूप मोठी गोष्ट आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
विलिनीकरणावर भाष्य
यावेळी फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत स्पष्ट भाष्य केले. विलिनीकरणाचा विषय हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. मी त्यात बोलणे योग्य राहणार नाही. जेव्हा वेळ येईल. ते अधिकृतरित्या सांगतील, त्यांच्यात काही ठरले तर मी प्रतिक्रिया देईल. रोज उगाच पतंग कशाला उडवायचे? आज सुनेत्रा पवार यांची पहिली मंत्रिमंडळ बैठक होती. दुखवटा असल्याकारणाने आम्ही फक्त शब्दसुमनाने त्यांचे स्वागत केले. त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली वाटचाल करेल. कालच्या निवडणुकीत त्यांचा चांगला परफॉर्मन्स राहिला, असे फडणवीसांनी म्हटले.





