नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
संसदेच्या सभागृहात सुरु असलेल्या गदारोळा दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात काँग्रेसने अविश्वास ठराव मांडला आहे. विरोधकांना बोलू दिले जात नाही, असा आरोप करत काँग्रेसकडून ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. या प्रश्नावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी सांगितले की, संविधानाच्या कलम 94-क अंतर्गत सभापतींना हटवण्याची नोटीस लोकसभा सचिवालयात सादर करण्यात आली आहे.
मंगळवारी विरोधी पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी प्रस्ताव सादर केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान बिर्ला यांनी राहुल गांधी आणि इतर विरोधी नेत्यांना बोलण्यापासून रोखले होते. सभागृहात अध्यक्षांच्या वक्तव्यातून काँग्रेस सदस्यांवर खोटे आरोप झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असे विरोधी पक्षाने प्रस्तावामध्ये म्हटले आहे. दुपारी १ वाजून १४ मिनिटांनी हा प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावर काँग्रेस आणि विरोधी पक्षातील ११८ खासदारांनी स्वाक्षरी केल्याची माहिती मिळत आहे. या प्रस्तावावर या अधिवेशनात चर्चा होणार की पुढील सत्रात, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
सोमवारपासूनच खासदारांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू दिले जात नसल्याने चार-पाच दिवसांपासून सभागृहातील वातावरण तापले आहे. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी (9 फेब्रुवारी) इंडिया आघाडीची बैठक घेत अविश्वास प्रस्ताव मांडण्याची तयारी सुरू केली होती. त्यासाठी सोमवारपासूनच खासदारांच्या स्वाक्षरी घेण्यात येत होत्या. त्यामध्ये काँग्रेस, डीएमके, सपाच्या खासदारांचा समावेश आहे.
Sharad Pawar: मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झाल?
प्रस्तावामध्ये असे म्हंटले गेले आहे की लोकसभा अध्यक्ष यांनी मनमानी पध्दतीने ८ खासदारांना निलंबित केले आहे. त्यांना केवळ त्यांच्या लोकशाही अधिकारांचा वापर केल्याबद्दल शिक्षा दिली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अनेक प्रसंगी, विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांना त्यांचा मूलभूत अधिकार असून बोलण्याची परवानगी देण्यातच आली नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. तसेच, काँग्रेस खासदार आणि मुख्य व्हिप के. सुरेश यांनी अनेक विरोधी पक्षांच्या वतीने लोकसभा सचिवालयात हा प्रस्ताव सादर केला. मात्र, या प्रस्तावावर तृणमुलच्या खासदारांच्या सह्या नसल्याचे समजते आहे.
प्रस्तावात कोण कोणते आरोप करण्यात आले आहे
राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला त्याना सभागृहात बोलू देत नाहीत. माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील उतारे वाचून दाखवताना हे प्रकर्षाने जाणवले.
काँग्रेस आणि माकपच्या 8 खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी निलंबित केले. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करूनही भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
गंभीर बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या महिला खासदारांपासून धोका होता, हे अध्यक्षांचे निवेदन बिनबुडाचे असल्याचा काँग्रेसचा आक्षेप आहे.





