Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCM Devendra Fadnavis : कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी...

CM Devendra Fadnavis : कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील – मुख्यमंत्री

नाशिक | Nashik

कुंभमेळा (Kumbh Mela) सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असे भव्य दिव्य आणि स्मरणीय आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) येथे होणाऱ्या कुंभमेळ्यातील अमृत स्नानाचे दिवसही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) आयोजित सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

YouTube video player

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, “साधू-महंतांच्या उपास्थितीत कुंभमेळ्याच्या तारखांची (Dates) घोषणा होणे ही खऱ्या अर्थाने कुंभपर्वाची सुरूवात आहे. कुंभमेळ्याचे संचलन आखाडे, साधू -महंत करतात, राज्य शासन सेवक म्हणून अधिकाधिक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करते. यावेळी देखील शासनातर्फे उत्तम सुविधा उभारण्यात येतील. कुंभमेळ्याबाबत साधू महं तांचा अनुभव मोठा आहे, त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. २०१५ मध्ये तयारीसाठी कालावधी कमी होता. यावेळी पूर्व तयारीसाठी अधिक कालावधी असल्याने शासन चांगली तयारी करीत आहे”, असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, “गोदावरी (Godavari) निर्मळ राहावी आणि कायम प्रवाही राहावी हेच कुंभचे उद्दिष्ट असून तसा शासनाचा प्रयत्न आहे. गोदावरीचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी उपायोजना करण्यात येत आहेत. गोदावरीत जाणारे पाणी स्वच्छ असावे यादृष्टीने सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी निविदा काढण्यात येत आहेत. नदी पात्रात अशुद्ध पाणी जाऊ नये असे प्रयत्न करण्यात येतील. नदी प्रवाहित राहिल्यास शुद्ध राहील, त्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे कुंभ आणि त्यानंतरही गोदावरीचे जल निर्मळ राहील”, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

तसेच “साधू-महंतांच्या (Sadhu-Mahant) सूचना लक्षात घेवून शासन आवश्यक नियोजन करेल. याशिवाय आखाड्यासाठी आवश्यक सुविधा उपालब्ध करून देण्यात येतील. साधूग्रामची जागा कायमस्वरूपी उपयोगात यावी यासाठी जमिन अधिग्रहित करण्यात येईल. कुंभमेळ्यासाठी शहरात रस्त्याचे जाळे तयार करण्यात येत आहे. कुशावर्त येथे गर्दी होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे”, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान असलेल्या चौंडीच्या विकासासाठी ६८१ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यांनी तयार केलेल्या घाटांचे संवर्धन करण्यात येत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे देखील उत्तम सुविधा उभारण्यात येतील. त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. तसेच भाविक आणि साधू – महंतांची सुरक्षितता महत्वाची असल्याने नियोजन करतांना सुरक्षा विषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात यावे”, अशी सूचना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, यावेळी यावेळी विविध आखाड्याच्या साधू-महंतांनी कुंभमेळा आयोजनाबाबत सूचना केल्या. यावेळी श्री रामानंद निर्मोही आखाडा, निर्मोही अनी आखाडा, श्री दिगंबर अनी आखाडा, निर्वाणी अनी आखाडा श्री पंचायती उदासीन आखाडा, श्री पंचायती नया उदासीन आखाडा, श्री पंचायती निर्मल आखाडा, श्री पंचायती अटल आखाडा, श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा, श्री पंच अग्नी आखाडा, यांच्यासह विविध आखाड्यांचे पदाधिकारी, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, पुरोहित संघाचे त्र्यंबकेश्वर येथील अध्यक्ष मनोज थेटे आदी उपस्थित होते.

नाशिक कुंभमेळा

सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६, दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी (स्थळ-रामकुंड पंचवटी)
प्रथम अमृतस्नान-सोमवार २ ऑगस्ट २०२७,आषाढ सोमवती अमावस्या.
महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार ३१ ऑगस्ट २०२७, श्रावण अमावस्या
तृतीय अमृतस्नान-शनिवार ११ सप्टेंबर २०२७, भाद्रपद शुद्ध एकादशी

त्र्यंबकेश्वर कुंभमेळा

सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६,
प्रथम अमृतस्नान-सोमवार २ ऑगस्ट २०२७, आषाढ सोमवती अमावस्या.
महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार ३१ ऑगस्ट २०२७, श्रावण अमावस्या
तृतीय अमृतस्नान-शनिवार १२ सप्टेंबर २०२७, भाद्रपद शुद्ध द्वादशी (वामन द्वादशी).

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 866 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता पुढील वर्षीच?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडत लांबल्याचे दिसत आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर पडणार असून...