अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होणार असून या निवडणुकांना महायुती एकमताने सामोरे जाईल. मात्र काही ठिकाणी स्थानिक राजकीय समीकरणांनुसार स्वतंत्र निर्णय घेऊन लढावे लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत स्पष्ट केले. महायुतीतील तीन प्रमुख घटक भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या निवडणुकांना कसे सामोरे जाणार, यावर चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले असून, या निर्णयाचे स्वागत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. निवडणूक आयोगाला तयारी करण्याची विनंती केली जाईल. निवडणुकांमध्ये भाटिया आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसी आरक्षण पूर्णपणे लागू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीने निवडणुकांसाठी सामूहिक रणनिती आखण्याचा निर्णय घेतला असला तरी, विविध जिल्ह्यांतील स्थानिक राजकीय परिस्थिती लक्षात घेता काही ठिकाणी अपवादात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
महायुतीचे तीनही घटक सत्तेत सहभागी असूनही, स्थानिक निवडणुकांमध्ये तिघांचे राजकीय हितसंबंध आणि स्थानिक पातळीवरील नेतेमंडळींची गणितं वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे एकमताने लढण्याचा निर्धार असतानाही, वास्तवात काही ठिकाणी संघर्षात्मक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीची राजकीय परीक्षा केवळ लोकसभा किंवा विधानसभा नव्हे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही कस लागणारी ठरणार आहे.