पुणे | Pune
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. हे आश्वासनाबाबत महायुतीच्या जाहीरनाम्यातही लिहिण्यात आले होते. पण आता या सरकारला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत अलेला असतानाही अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही. यावरुन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात विचारण्यात आले. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि.२१) राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘सरकार शब्द फिरवणार नाही. योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय होईल. कर्जमाफी कधी करायची? या संदर्भात काही नियम आहेत, पद्धती आहे,’ असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते.
शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांच्या आत समिती नेमली जाईल. त्यानंतर या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने नुकतेच प्रहारचे संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना दिले होते. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले. सरकारच्या या आश्वासनानंतर त्यांनी हे आंदोलन स्थगित केले होते.
महत्त्वाची बाब म्हणजे, महिन्याभरापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी दिले आहे का? मी तरी दिलेले नाही, असे म्हणत हात वर केले होते. ज्यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले होते. त्यामुळे महायुती सरकारला कर्जमाफीबाबत निर्णय घ्यायचा आहे की नाही, असा प्रश्न शेतकरी संघटनांकडून विचारण्यात आला होता. पण शेतकरी कर्जमाफी देण्यात येणारच असे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यामुळे महायुतीच शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून एकवाक्यता नसल्याचे पाहायला मिळाले.
जगातील ६०० विद्यापिठांमध्ये पुणे विद्यापीठाचे नाव
पुणे विद्यापीठाचा दर्जा वाढला पण विभागांची अवस्था फार चांगली नाही, प्राध्यापकांची कमतरता आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवी म्हणाले, “पहिल्यांदा मी पुणे विद्यापीठाच मनापासून अभिनंदन करतो. जगातल्या पहिल्या 600 विद्यापीठात आज पुणे विद्यापीठ आहे. मला अपेक्षा आहे की, पुढच्यावर्षी किंवा दोन वर्षात पहिल्या 500 विद्यापीठात आपली विद्यापीठे असतील. जगातल्या पहिल्या 500 विद्यापीठांना मान असतो. त्या दिशेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाटचाल सुरु आहे. इथले कुलगुरु, व्यवस्थापन परिषद, सिनेटर, प्राध्यापकांच मनापासून अभिनंदन करतो. जे तुम्ही डेफिसिट सांगितल, त्या बद्दल उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वप्रकारच्या मान्यता दिल्या आहेत” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




