Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजएकदा नव्हे १०० वेळा डोकं ठेवायला तयार…; मुख्यमंत्री शिंदेंनी मागितली माफी

एकदा नव्हे १०० वेळा डोकं ठेवायला तयार…; मुख्यमंत्री शिंदेंनी मागितली माफी

मुंबई | Mumbai
मालवण यथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेनंतर आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली आहे. महायुती सरकारमधील घटकपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच माफी मागितली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा, अस्मिता आहे यावर विरोधकांनी राजकारण करू नये, सर्वांनी एकमताने शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा त्याठिकाणी कसा उभा राहील यासाठी सहकार्य करावे असे शिंदेंनी म्हटले आहे.

- Advertisement -

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधक माफीची मागणी ते करतायेत, छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या चरणावर मी एकदा नव्हे १०० वेळा डोकं ठेवायला तयार आहे. १०० वेळा माफी मागायला कमीपणा वाटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच आम्ही राज्याचा कारभार करतो. मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांनीही सद्बुद्धी द्यावी.

पुढे ते असे ही म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार पुतळा तिथे उभारण्यासाठी ज्या काही सूचना असतील त्या विरोधकांनी सांगितल्या पाहिजेत. सहकार्य केले पाहिजे. झालेली घटना दुर्दैवी आहे. नौदलाने चांगल्या भावनेने तो पुतळा उभारला पण ही घटना घडलेली आहे. या घटनेचे राजकारण करणे त्यापेक्षा दुर्दैवी आहे. राजकारण करायला इतर मुद्दे आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज आपली श्रद्धा, दैवत आहे यावर राजकारण करू नये असे त्यांनी सांगितले.

नौदलाची मागणी
एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर कसा उभा राहील, याचा विचार केला पाहीजे. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण किल्ल्याचा परिसर संरक्षित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी संरक्षण केले जाणार आहे. नौदलास त्या ठिकाणी काम सुरु करायचे आहे. बुधावारी आम्ही बैठक घेतली. त्यासाठी दोन समित्या नियुक्त केल्या आहेत. त्यात आयआयटीचे इंजिनिअर, नौदलाचे अधिकारी आणि इतर लोक असणार आहे. त्या ठिकाणी लवकरच लवकर भव्य पुतळा उभारण्याचे काम केले जाईल.

छत्रपती शिवाजी महाराज अस्मितेचा विषय
शिवसेना, भाजपा आणि अजित पवार आम्ही सगळे महायुतीत काम करतो. छत्रपती शिवाजी महाराज हा विषय राजकारणाचा नाही. हा विषय आमच्यासाठी श्रद्धा आणि अस्मितेचा आहे. त्यामुळे कुणीही यामध्ये राजकारण न करता शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा तिथे उभा कसा राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या