दिंडोरी | प्रतिनिधी Dindori
किसान सभेच्या शेतकरी, शेतमजूर व आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिंडोरी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले बिर्हाड व चक्काजाम आंदोलन सहाव्या दिवशी स्थगित करुन दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यातील आंदोलनकर्ते दिंडोरी येथे जमा होवून नाशिककडे रवाना झाले आहे. त्यामुळे दिंडोरी – नाशिक रस्त्यावर वाहनाच्या पाच ते सहा कि.मी. रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय झाल्याने सुरगाणा, कळवण, पेठ, चांदवड तालुयातील हजारो आंदोलनकर्ते दिंडोरीत जमा झाले होते. त्यामुळे दिंडोरी तहसील कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दिंडोरी येथुन तीन वाजताआपले बिर्हाड घेवून नाशिककडे रवाना झाले आहे. सुमारे सहा ते सात हजार आंदोलकर्ते सहभागी झाले आहे.यावेळी त्यांनी चारची रांग तयार केली. रस्त्याच्या डाव्या बाजूने नाशिककडे कूच केली. त्यांचे स्वयंसेवक वाहनांना जागा करुन देत होते. परंतू रांगा मोठ्या असल्याने वाहतूक पुर्णपणे ठप्प पडली होती.
नाशिक येथून ते दोन दिवसांनी मुंबई रवाना होणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. हातात लाल झेंडे घेतलेले अबालवृद्ध, महिला, युवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले असून ‘लाल झेंडा’, लाल सलाम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे. या घोषणांमुळे दिंडोरी – नाशिक रस्त्यावर अक्षरशः लाल वादळात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कडायाची थंडी, अंधारी रात्र आणि दिवसाचे तळपते ऊन अंगावर घेत आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडले आहे. रस्त्यावरच तीन विटांची चूल पेटवून खिचडी शिजवली जात आहे. शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नांवरील रास्त मागण्या असूनही जिल्हा प्रशासन दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शिष्टमंडळाला उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने कॉ. जे. पी. गावित यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
उमराळे, पिंपळणारे येथे मोर्चेकर्यांना मुक्काम
दरमजल करत दिंडोरीतून निघलेला मोर्चा शुक्रवारी (दि.२३) पिंपळणारे फाटा येथे मुक्कामी थांबलेला आहे. तर पेठ येथून निघालेले मोर्चेकरी नाशिककडे येताना रात्री उमराळे गावाच्या शिवारात हॉटेल संस्कृती परिसरात मुक्कामी थांबले आहेत. हे दोन्ही मोर्चे शनिवारी(दि.२४) रोजी नाशिक शहरात दुपारी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.




