Friday, March 28, 2025
Homeनगरविधानसभेत महायुतीचा झेंडा फडकविणार!

विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकविणार!

शेतकर्‍यांना दिलासा देण्यात कमी पडणार नाही

लोणी |वार्ताहर| Loni

खोट्या नॅरेटीव्हने मिळविलेला विजय हा फार काळ टिकणार नाही, उद्याचा दिवस महायुतीचा असणार आहे. आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकविणारच, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. लोणी येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, आ.राम शिंदे, आ.मोनिकाताई राजळे, डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डीले, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, सदाशिव लोखंडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी उपस्थित केलेल्या खोट्या मुद्यांना खोडून काढण्यात आम्ही कमी पडलो.

- Advertisement -

यातून बोध घेवून आम्हाला आता पुढे जायचे आहे. मोदी हटावचा नारा देणारे हटले परंतू देशाच्या पंतप्रधान पदावर तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी विराजमान झाले, याचा अभिमान देशवासियांना आहे. महाविकास आघाडीने कसा प्रचार केला या खोलात आता आम्हाला जायचे नाही. माझ्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांना विखे पाटील जास्त जवळून ओळखतात, असे सुचक वक्तव्य करुन या निवडणुकीने आम्हाला बरेच काही शिकविले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात निवडणूक कायात कांदा आणि दूधाच्या भावाचे प्रश्न उपस्थित झाले. याचा अंडर करंट होता. दूधाला पाच रुपये अनुदान दिले. काही शेतकर्‍यांना मिळाले, काहींना मिळाले नाही. परंतू आता दूधाच्या भावाबाबत तसेच कांदा आणि सोयाबिन उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सरकार निर्णय करेल. राज्यातील महिला आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी सरकार निर्णय घेतच असून, यापुढेही या निर्णयात सरकार कुठेही कमी पडणार नाही.

डॉ.सुजय विखे पाटील यांचा उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले की, पराभव झाला असला तरी, खचून जायचे नाही. महाविकास आघाडीच्या खोट्या नॅरेटीव्हमुळे महाविकास आघाडीचा विजय झाला असला तरी, तो फारकाळ टिकणार नाही. पुन्हा एकदा आपण लढू आणि जिंकुन दाखवू. सत्य हे सत्यच असते. विखे पाटील परिवार रात्रंदिवस लोकांसाठी काम करीत आहे. सहकाराच्या माध्यमातून चौथी पिढी आज समाजासाठी कार्यरत आहे. या जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी पालकमंत्री आणि मी सदैव तत्पर असून, जिल्ह्याच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही असेही त्यांनी आश्वासित केले.

विकासाला महायुतीचे पाठबळ
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नांना महायुती सरकार पाठबळ देत असल्याचे सांगितले. भविष्यात तिर्थक्षेत्र पर्यटनासाठी नेवासे येथे संत ज्ञानेश्वर सृष्टी, अहिल्यानगरमध्ये स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक आणि शिर्डी येथे साईबाबांच्या जीवनावरील थिमपार्क उभारण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध करुन द्यावा, अशा मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

रेल्वे प्रशासनाने उगांव स्टेशनवर पॅसेंजरला थांब्याबाबत दोन महिन्यात सकारात्मक निर्णय घ्यावा

0
उगाव | वार्ताहरउगांव रेल्वे स्टेशनवर पँसेंजरला थांबा मिळत नसल्याने शिवडीच्या सरपंच संगिता सांगळे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनवाणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे...