Sunday, July 7, 2024
Homeनगरशेतकर्‍यांना ग्रीनफिल्ड भूसंपादनाचा योग्य मोबदला द्या - सोनवणे

शेतकर्‍यांना ग्रीनफिल्ड भूसंपादनाचा योग्य मोबदला द्या – सोनवणे

...अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा प्रशासनाला निवेदनातून दिला इशारा

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

- Advertisement -

सूरत-नाशिक-अहमदनगर मार्गे ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गासाठी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे भागातील जमिनीचे प्रशासनाने अन्यायकारक पद्धतीने भूसंपादन केले आहे. संबंधित बाधित शेतकर्‍यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय जमिनीत पाय ठेवू देणार नाही. याप्रश्नी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संगमनेर पंचायत समितीचे माजी सभापती, शेतकरी नेते अविनाश सोनवणे यांनी प्रशासनाला दिला आहे. अविनाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रीनफिल्ड भूसंपादन बाधित शेतकर्‍यांनी संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांची भेट घेत मागणीचे निवेदन दिले. सुरत-नाशिक-अहमदनगर ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनाच्या प्राप्त निवाड्याविषयी माहिती देण्याची मागणी शेतकर्‍यांनी प्रांताधिकारी हिंगे यांच्याकडे केली. याप्रसंगी अविनाश सोनवणे, राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष हौशीराम सोनवणे, किसन दिघे, माजी सरपंच योगेश सोनवणे, किसन सुपेकर, आर. पी. दिघे, रावसाहेब दिघे यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते.

सदर ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव, आजमपूर, आरामपूर, हसनाबाद, जुनेगाव, तळेगाव, वडझरी बु., वडझरी खुर्द, कासारे, लोहारे आदी गावांमधून जाणार आहे. या गावांमधील शेतकरी पूर्णतः शेतीवर अवलंबून असून तीन वर्षांपासून जमिनी रस्त्यामध्ये जाणार असल्याने उतार्‍यावर महाराष्ट्र शासन नाव आलेले आहे. या संदर्भात बाधित शेतकर्‍यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. हरकती घेऊन त्यावर सुनावणी देखील झालेली आहे. रस्त्यामध्ये येणार्‍या विहिरी, घरे, गोठे, सायफन, झाडे-झुडुपे इत्यादींच्या नोंदी देखील झालेल्या आहेत. मात्र, शेतकर्‍यांना अद्याप कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामुळे बाधित शेतकरी संतप्त झालेले आहेत.

ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग काम करणार्‍या एजन्सीज (ठेकेदार) या परिसरात सर्वेक्षण करीत असून दोन महिन्यात काम सुरू होणार आहे, असे सांगत आहेत. परंतु शासकीय पातळीवरून त्याची शेतकर्‍यांना कोणतीही कल्पना दिली जात नाही. जमिनीचे पैसे किती मिळणार, कधी मिळणार हे शेतकर्‍यांना माहीत नाही. प्रचलित रेडिरेकनरनुसार मूल्यांकन होणार की थेट खरेदीने होणार याबद्दल शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. या प्रकारामुळे शेतकर्‍यांना शेतीवर कोणत्याही प्रकारचे नियोजन करता येत नाही. शेतकर्‍यांना खात्रीशीर उत्पन्न घेता येत नाही. यासंदर्भात त्वरित निर्णय घेऊन संभ्रमावस्था दूर करावी व शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली असून योग्य मोबदला न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा, शेतकरी नेते, माजी सभापती अविनाश सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व शेतकर्‍यांनी दिला आहे.

तळेगाव भागातून निळवंडे धरण प्रकल्पांतर्गतचा डावा कालवा गेला असून कालव्याची चाचणी घेऊन पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या जमिनी बागायती होणार असतानाच हे अन्यायकारक भूसंपादन लादण्यात आले. ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकर्‍यांच्या मनाविरुद्ध भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे बाधित शेतकर्‍यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळावा, अन्यथा आंदोलन अटळ आहे.
– हौशीराम सोनवणे (अध्यक्ष-राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनी, संगमनेर)

- Advertisment -

ताज्या बातम्या