महाराष्ट्र राज्यात करोनाची साथ आटोक्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील साधारणत: 64 लाख करोना रुग्ण बरे होऊन त्यांच्या घरी परतले आहेत. सद्यस्थितीत दीड लाखांपेक्षा जास्त रुग्ण गृहविलगीकरणात आहेत असेही सांगितले जाते. महाराष्ट्र लसीकरणात देशात आघाडीवर आहे.
राज्यात साधारणत: नऊ कोटी लोकांना करोना लसीचा किमान एक डोस देण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हळूहळू निवळत असली तरी या परिस्थितीचे दीर्घकालीन परिणाम समाजाला सहन करावे लागणार आहेत असे मत तज्ञ वारंवार व्यक्त करत असतात. सरकार वेळोवेळी मनुष्यबळाचा अहवाल प्रसिद्ध करत असते.
करोनामुळे महाराष्ट्राला बेरोजगारीचा मोठा फटका बसल्याचा निष्कर्ष या अहवालात नमूद करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात अनेक ग्रामपंचायतींमध्ये रस्ते, पूलबांधणीसारखी मोठी कामे रोजगार हमी योजनेंतर्गत झालेली नसल्याचे सांगितले जाते. हा काळ अनेकांसाठी अनेक आव्हानांचा आहे. तथापि माणसे आशावादी असतात. काळ बदलत असतो यावर त्यांचा विश्वास असतो. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ यातील मर्म जाणून घेत काहींनी समस्यांवर मात करण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
गणेशगाव हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक आदिवासीबहूल गाव. या गावातील महिला एकत्र आल्या आहेत. त्यांनी कृषी बीज बँक सुरु केली आहे. शेतकर्यांनी सेंद्रीय शेती करुन सकस धान्य उत्पादित करावे अशी समाजाची अपेक्षा असते. तथापि शेतकर्यांची बियाण्यांमध्ये फसवणूक झाल्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. ही उणीव दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आणि शेतकर्यांना सकस बियाणे उपलब्ध करुन देणे हा बीज बँक निर्मितीमागचा उद्देश असल्याचे या महिलांनी माध्यमांना सांगितले. पहिल्या टप्प्यात भात आणि नागलीच्या बियाणावर भर दिला जाणार आहे.
या महिलांकडे आत्तापर्यंत 28 प्रकारचे धान्य जमा झाले आहे. त्याचे प्रदर्शन देखील महिलांनी भरवले होते. हळदीकुंकवासारख्या कार्यक्रमांनाही वाण म्हणून धान्यच देण्याची कल्पना महिलांनी राबवली आहे. गावातच बियाणे निर्मिती उद्योगासाठी यंत्र बसवण्यात आले आहे. आव्हानांचा सामना करण्याचा असाच प्रयत्न सुरगाणा या आदिवासी तालुक्यातील गारमाळ गावातील एका सुशिक्षित युवकाने केला आहे. तो अभियंता आहे. पण टाळेबंदीच्या काळात त्याचाही रोजगार गेला आणि तो गावी परतला.
आता त्याने गावातच कृषी पर्यटन केंद्र सुरु केले आहे. केंद्रातील झाडे आणि भिंतींवर वारली चित्रे रंगवली आहेत. या केंद्रामुळे काही स्थानिक तरुणांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. रोजगाराच्या समस्या कायमच राहाणार आहेत. पण त्यांचा बाऊ करुन हातावर हात ठेऊन बसणे लोकांना पसंत नाही. लोक बदलत आहेत. नवनव्या कल्पना प्रत्यक्षात आणू पाहात आहेत. अर्थात बदलाचा वेग अत्यंत संथ असतो.
बदल झाल्याचे एकदम कोणाच्याही लक्षात येत नाही. तथापि त्याची छोट्या छोट्या प्रयोगातून त्याची खात्री पटावी अशी छोटी छोटी उदाहरणे ठिकठिकाणी आढळत आहेत. नाशिक परिसराचा आढावा घेतला गेला तर कदाचित असे प्रयोग जागोजाग होत असल्याचे लक्षात येईल. शेतीतज्ञांनी प्रयोग केले तर ते एकवेळ समजण्यासारखे आहे. तथापि ज्यांच्याकडून असे प्रयोग केले जाणे समाजाला कदाचित अपेक्षित नसावे असे हे प्रयोग आहेत.
नवा भारत घडवण्याची महत्वाकांक्षा पंतप्रधान त्यांच्या ‘मन की बात’मधून वारंवार बोलून दाखवत आहेत. कदाचित त्यातून प्रेरणा देखील अनेकांनी घेतली असेल. किंवा अनेक प्रयोग लोकांच्या उत्स्फुर्त प्रेरणेतुनही जागोजागी होत असतील. निमित्त कोणतेही असो, पण कल्पनेतील नवा भारत घडवण्यात वास्तवातील या छोट्याछोट्या प्रेरणासुद्धा नक्कीच उपयुक्त ठरतील याबद्दल दुमत होऊ नये.