आशिया कप २०२५ – भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना आज दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळण्यात आला.पाकिस्तानच्या संघाने दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानास भारतीय संघाच्या अभिषेक शर्मा व शुभमन गिलच्या धडाकेबाज फलंदाजीने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या गोलंदाजांना जेरीस आणले. तर तिलक वर्माच्या निर्णायक फलंदाजीने भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघास नमविले. भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ गडी व ७ चेंडू राखून विजय मिळविला.
नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या संघाकडून एस.फरहान व फखर जमान सलामीला फलंदाजीस आले. सामन्याच्या तिसऱ्या षटकात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने फखर जमानला झेल बाद करत पाकिस्तानच्या संघास पहिला धक्का दिला. फखर जमानने ९ चेंडूत १५ धावा केल्या. अकराव्या षटकात शिवम दुबेच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माने सैम अयुबला झेलबाद करत पाकिस्तानच्या संघाचा दुसरा गडी बाद केला.सैम अयुबने १७ चेंडूत २१ धावा केल्या.
चौदाव्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर वरून चक्रवर्तीने हुसेन तलतला १० धावांवर झेल बाद करत तंबूत परत पाठविले.पाकिस्तानी फलंदाज एस फरहानने ४५ चेंडूत ५८ धावा करत अर्धशतक केले.१५ व्या षटकात शिवम दुबेच्या गोलंदाजीवर सुर्यकुमार यादवने एस फरहानला झेलबाद केले. एकोनाविसाव्या वरून चक्रवर्तीने एम नवाजला धावबाद केले. एम नवाजने १९ चेंडूत २१ धावा केल्या.सलमान आगाने १७, तर फहीम अश्रफने २० नाबाद धावा केल्या. २० व्या षटका अखेर पाकिस्तानच्या संघाने ५ गडी बाद १७१ धावा केल्या.
भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा व शुभमन गिल सलामीला फलंदाजीस आले. अभिषेक शर्माने पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूतच षटकार लगावत भारतीय संघाच्या फलंदाजीची दमदार सुरुवात केली तर शुभमन गिल आणि अभिषेक शर्माच्या जोडीने पाकिस्तानी गोलंदाजीवर धडाकेबाज फलंदाजी केली. दहाव्या षटकात अर्धशतका पर्यंत पोहचलेल्या शुभमन गिलला फहीम अश्रफने बाद केले. शुभमन गिलने २८ चेंडूत ८ चौकार लगावत एकूण ४७ धावा केल्या. शुभमन गिल पाठोपाठ फलंदाजीस आलेला सुर्यकुमार यादवला अब्रार अहमदने शून्य धाव संख्येवर झेल बाद केले.
१३ व्या षटकात अब्रार अहमदच्या गोलंदाजीवर हॅरीस रौफने अभिषेक शर्माला झेल बाद केले. अभिषेक शर्माने ३९ चेंडूत ५ षटकार व ६ चौकार लगावत एकूण ७४ धावा केल्या. १७ व्या षटकात हॅरीस रौफच्या गोलंदाजीवर संजू सॅमसन १७ चेंडूत १३ धावा करत बाद झाला. तिलक वर्माने १९ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या तर हार्दिक पंड्याने नाबाद ७ धावा केल्या. भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ गडी व ७ चेंडू राखून विजय मिळविला.





