Monday, June 9, 2025
HomeनगरCrime Diary : टोळ्यांचा वर्चस्ववाद, पोलिसांसमोर गंभीर आव्हान

Crime Diary : टोळ्यांचा वर्चस्ववाद, पोलिसांसमोर गंभीर आव्हान

अल्पवयीनांचा सहभाग, सोशल मीडियावर खुन्नसचा उफान

अहिल्यानगर |सचिन दसपुते| Ahilyanagar 

- Advertisement -

शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वाढत्या वर्चस्ववादामुळे पोलिसांसमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. सावेडी, एमआयडीसी, केडगाव, भिंगार उपनगरात टोळ्यांमध्ये सातत्याने वाद, खून, खुनाचा प्रयत्न, गोळीबार अशा घटना घडत असून, विशेष म्हणजे या टोळ्यांत अल्पवयीन मुलांचा सक्रिय सहभाग आहे. सोशल मीडियावर ‘खुन्नस’ देत एकमेकांना संपवण्याच्या धमक्या देण्यात येत असून, हे प्रकरण अधिकच चिघळले आहे.

गेल्या रविवारी रात्री तपोवन रस्ता, ढवण वस्ती येथील इंडो आयरिश हॉस्पिटलसमोर प्रमोद रामदास घोडके (वय 24) याच्यावर पाच जणांनी हल्ला केला. कारण, त्याचे ऋषी ढवणशी असलेले संबंध. यामध्ये सराईत गुन्हेगार भिमराज आव्हाड याने गावठी कट्ट्यातून हवेत दोन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तोफखाना पोलिसांनी तत्काळ चौघांना अटक केली असून, गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. मात्र, हा वाद वर्चस्वासाठी झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या घटनेतील प्रमुख संशयित मयूर नंदकुमार फणसे याचे या भागात हॉटेल असून, तो परिसरात आपली सत्ता प्रस्थापित करू पाहत आहे. त्याला ‘पांगरमल’ या बहुचर्चित दारूकांडातील संशयित आरोपी भिमराज आव्हाड व त्याचा जावई राहुल सांगळे पाठबळ देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वर्चस्ववाद रंगत असल्याची चर्चा आहे.

एमआयडीसी भागात भोर्‍या आणि लपका सोमवंशी या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वासाठी संघर्ष झाला. सुरूवातीला भोर्‍याच्या टोळीवर हल्ला करून धिंड काढली गेली, त्यानंतर त्यांनी लपकावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याचा सूड घेण्यासाठी लपकाच्या टोळीने वैभव नायकोडी (वय 19) याचे अपहरण करून त्याचा खून केला व पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह केकताई जंगलात जाळून टाकला. या प्रकरणी लपका टोळीला अटक झाली असून, त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मध्यंतरी केडगाव उपनगरात ‘रावण साम्राज्य’, ‘महाकाल’, ‘शिवशंभो’ अशा ग्रुपवर एकमेकांना धमक्या देण्याचे प्रकार सुरू होते. एका ग्रुपच्या टपरीवर हल्ला झाल्याच्या रागातून विरोधी गटातील 16 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याला निर्जनस्थळी नेऊन अमानुष मारहाण व अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. सोशल मीडियावर तलवारी, कोयते, बंदूक घेतलेल्या चित्रफिती शेअर केल्या जात असून, यातून दहशत निर्माण केली जात असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले होते.

पोलीस यंत्रणा दबावाखाली
शहरात व उपनगरांत वाढणारी गुन्हेगारी, टोळ्यांचे वर्चस्ववाद, अल्पवयीनांचा सहभाग, सोशल मीडियावर वाढती गुन्हेगारी मानसिकता, तसेच गुन्हा घडल्यानंतर वाढता राजकीय हस्तक्षेप या सर्व गोष्टींमुळे पोलीस यंत्रणा दबावाखाली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याने काहीवेळा दुर्लक्ष केले, तर काही ठिकाणी तोफखाना पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विश्वासार्हता निर्माण केली आहे. मात्र, एकूणच चित्र पाहता, हे टोळीयुध्द शांत राहील का, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.

गावठी कट्टे, धारदार शस्त्रांचा सर्रास वापर
जिल्ह्यात गावठी कट्टे सहज उपलब्ध होत असून, त्याचा गुन्ह्यांत मुक्तपणे वापर होत आहे. कट्टा दाखवून दहशत निर्माण करणे, गोळीबार करून जीव घेण्याचा प्रयत्न अशा घटना घडत आहेत. तलवार, कोयते घेऊन युवक फिरत असून, किरकोळ वादातून हल्ले होत आहेत. वाढदिवस रात्री साजरे करून तलवारीने केक कापणे, त्याचे व्हिडीओ व्हायरल करणे आणि त्यातून ‘खुन्नस’ दाखवली जात आहे.

टोळीयुध्दातून दोघांचा खून
राजकीय व वर्चस्ववादातून राष्ट्रवादी कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे याच्या टोळीने हल्ला करून खून केला होता. सध्या शिंदे टोळी तुरूंगात आहे. त्याचप्रमाणे अवैध धंद्याची तक्रार केल्याच्या रागातून ओंकार उर्फ गामा भागानगरे या युवकाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात गणेश हुच्चे व त्याच्या टोळीला अटक करण्यात आली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दीड वर्षांपासून सहा पंचायत समित्यांना बीडीओंची प्रतिक्षा!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीयदृष्ट्या जागृत असणार्‍या अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन वर्षापासून सहा पंचायत समितीमध्ये प्रभारी राज आहे. या ठिकाणी गटविकास अधिकारी पद रिक्त...