राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
तुमच्या वडिलांनी आमच्या दोघा भावांत मध्यस्थी करून वाद का मिटवला, असे म्हणून आरोपीने सुनील नालकर यांच्यावर कुर्हाडीने घाव घातला. तसेच हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली. ही घटना दि. 28 मे रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे घडली.
सुनिल भाऊसाहेब नालकर, (वय 39) रा. रामपूर ता. राहुरी, हल्ली रा. चिंचवड, जि. पुणे, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, सुनील नालकर यांचे दोन मामा राजेंद्र मुसमाडे, सुरेश मुसमाडे यांचे शेतीवरून वाद झाल्याने ते वाद सुनील नालकर यांनी मध्यस्थी करुन सोडवले होते. त्यानंतर मामा राजेंद्र हा नालकर यांना वेळोवेळी फोन करून शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत आहे. दि. 28 मे रोजी दुपारी 2 वाजता सुनील नालकर हे धानोरे येथे असताना त्यांच्या भावजईने फोन करुन सांगितले की, तुमचे मामा राजेंद्र मुसमाडे हे घरासमोर येऊन ते जोरजोराने शिवीगाळ करत आहेत.
तेव्हा सुनील नालकर, त्यांची आई व भाऊ हे तांभेरे येथील त्यांचे मामा राजेंद्र मुसमाडे यांच्या घरी गेले आणि मामांना विचारले की, तुम्ही आमच्या घरी येऊन शिवीगाळ का करत होते? तेव्हा मामा दारुच्या नशेत होते व ते म्हणाले, तुमच्या वडिलांनी आमच्या दोघा भावात मध्यस्थी का केली, असे म्हणून आरोपी राजेंद्र मुसमाडे याने नालकर यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर कुर्हाडीने घाव घातला. तसेच तुम्ही जर परत माझ्या नादी लागले, तर मी तुम्हाला एका एकाचे हातपाय तोडून मारुन टाकील. मी काहीतरी विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या करील, अशी धमकी दिली. या घटनेत सुनील नालकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांनी कोल्हार बुद्रुक येथील एका रुग्णालयात उपचार घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सुनील भाऊसाहेब नालकर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी राजेंद्र विठ्ठल मुसमाडे, रा. तांभरे, ता. राहुरी, याच्यावर गु.र.नं. 611/2025 भारतीय न्याय संहिता कलम 118 (1), 351 (2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.