अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
टेलिग्रामवर हॉटेल रेटिंग व ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून खासगी महाविद्यालयातील शिक्षिकेची तब्बल 5 लाख 45 हजार 968 रूपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित टेलिग्राम आयडी धारकांविरोधात मंगळवारी (3 फेब्रुवारी) येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अहिल्यानगर शहरातील आगरकर मळा परिसरात राहणार्या 39 वर्षीय खासगी शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे टेलिग्राम खाते आहे. दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांच्या टेलिग्राम अकाउंटवर एका अनोळखी ग्रुपमध्ये त्यांना अॅड करण्यात आले. त्यानंतर एका टेलिग्राम धारकाने गुगल लिंक पाठवून हॉटेलला रेटिंग देण्यास सांगितले. सदर रेटिंग दिल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात काही रक्कम जमा झाल्याने विश्वास निर्माण झाला. त्यानंतर अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले.
या ग्रुपमधील टेलिग्राम आयडी धारकाकडून विविध टास्क देण्यात आले. टास्क पूर्ण केल्यानंतर पैसे परत मिळतील, असे सांगून फिर्यादी महिलेकडून वेगवेगळ्या बँक व यूपीआय खात्यांवर 10 हजारांपासून 50 हजार रूपयांपर्यंत रक्कम भरण्यास भाग पाडण्यात आले. मात्र, चुकीचा स्टेप फॉलो झाला, अकाउंट फ्रिज झाले आहे, अनफ्रिज करण्यासाठी आणखी पैसे भरा अशी कारणे सांगत सतत अधिक रक्कम उकळण्यात आली.
या प्रकारात शिक्षिकेने 3 ते 5 जानेवारी या कालावधीत एकूण दोन लाख 49 हजार 740 रूपये विविध खात्यांवर वर्ग केले. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील एका खात्यावर दोन लाख 92 हजार 228 रुपये आरटीजीएसव्दारे पाठविण्यात आले. मात्र, पैसे परत न मिळाल्याने व पुन्हा तीन लाख 80 हजार रूपये भरण्याची मागणी करण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री फिर्यादी महिलेला झाली व त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला.





