नाशिक | प्रतिनिधी
राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार व खासदार राजन विचारे यांची कन्या चि.सौ.कां. लतिशा यांचा आज मालेगाव येथे शुभविवाह सोहळा पार पडला. अवघ्या २५ पेक्षाही कमी नातलगांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडल्यामुळे सर्वत्र या विवाहसोहळ्याचे कौतुक केले जात आहे…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विवाहास दृकश्राव्य (फेसबुक लाईव्ह) माध्यमातून हजेरी लावत नवदाम्पत्यास शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
मनमाड चौफुली येथील आनंद फार्म येथे मोजक्या वऱ्हाडीच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला आलेल्या मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती.
संपूर्ण विवाहसोहळा फेसबुक लाईव्ह स्वरुपात असल्यामुळे अनेकांनी लाईक्स कमेंटससह शुभेच्छापर संदेश देत यावेळी नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.
करोनाचे नियम धाब्यावर बसवत अनेक ठिकाणी विवाह सोहळ्यांना नातेवाईकांची गर्दी जमा करण्याच्या घटना सध्या घडत आहेत. तसेच प्रशासनाकडून गर्दी होणार्या विवाह सोहळ्यांवर दंडात्मक कारवाईदेखील केली जात आहे.
असे असताना राज्याच्या कॅबिनेट मिनिस्टर असलेल्या नेत्याच्या मुलाचे लग्न घरातल्याच मंडळीमध्ये पार पडल्यामुळे कौतुक होत आहे. विवाहसोहळ्याला पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित असल्याची माहिती आहे मात्र, कोणीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
कोविड काळात सर्व नियम पाळत हा विवाहसोहळा पार पाडण्यात आला. मुलाचे मामा, काका मावशी, आत्या, मामा याव्यतिरिक्त कोणीही या सोहळ्याला उपस्थित नसल्याची माहिती बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी देशदूतशी बोलताना दिली.