Friday, June 13, 2025
Homeसंपादकीयसंपादकीय : १२ जून २०२५ - बोलभांडांची चलती

संपादकीय : १२ जून २०२५ – बोलभांडांची चलती

सत्तेचे कारभारी कोणीही असोत, राज्यात राजकीय परिस्थिती कशीही असो आणि सरकारकडे पूर्ण बहुमत असो व नसो, त्या त्या पक्षातील वाचाळवीर त्यांचा बेताल बडबडीचा धर्म अगदी कट्टरतेने निभावतात. सध्या गोव्याचे आरोग्यमंत्री प्रकरण चर्चेत असले तरी मराठी मुलखातही जनतेला गृहीत धरून वाट्टेल तशी बडबड करणार्‍यांची कमतरता अजिबात नाही. दुर्दैवाने याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही.

- Advertisement -

सगळ्याच पक्षात अशा बोलघेवड्यांची संख्या वाढत चाललेली आढळते. जणू काही बेताल बडबड हाच माणसांचा राजकीय प्रवेशाचा एकमेव राजकीय निकष बनला असावा. याबाबतीत नितेश राणे हे कदाचित सर्वांना वरचढ ठरतील. ते सतत वादग्रस्तच बोलतात. साधे बोलतच नाहीत. त्यामुळे राणे आणि वाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू बनल्या आहेत. नुकतेच ते मुख्यमंत्र्यांना सर्वांचा बाप ठरवून मोकळे झाले. राजकारणात शिरलेल्या व्यक्तींची वेगाने बदलती सांपत्तिक स्थिती सामान्य माणसांना कायमच अचंबित करते. त्याचा हिशेब लोकांनी कधी मागितल्याचे ऐकिवात नाही.

पण माणिकराव कोकाटेंनी मात्र शेतकर्‍यांकडेच कर्जमाफीच्या पैशांचा हिशेब मागितला. त्यांची तुलना भिकार्‍यांशी केली. सध्या सुरु असलेल्या नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांच्यातील वादात यापेक्षा वेगळे काहीच घडत नाही. संजय राऊतांविषयी तर काय बोलावे? रोज सकाळी माध्यमांना नवे खाद्य पुरवण्याचा विडाच त्यांनी उचलला असावा. ते कोणाला सडके ठरवतात. कधी शाब्दिक बुटांनी मारतात. अफजलखानाशी तुलना करतात. ते इतके बोलतात की सध्या त्यांच्या बोलण्याची दखल माध्यमेही तातडीने घेइनाशी झाली आहेत.

राज्याच्या रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाहनचालकांची पाठ सोडलेली नाही. पण गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना हेमामालिनीच्या गालांशी केली. शेतकर्‍यांच्या मुलांनी त्यांच्या शेतात पिकलेला भाजीपाला शाळेत विकायला आणावा, असा सल्ला दादा भुसे यांनी दिला. तात्पर्य, राज्यातील वाचाळवीरांची आणि त्यांच्या वादग्रस्त विधानांची यादी करायची ठरवले तर ती मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाईल. बरे, यांच्या वाचाळतेला जे आळा घालू शकतील अशी जनतेची अपेक्षा असते, त्यांचीच जीभ अनेकदा घसरते. या सगळ्यांनी मिळून अनेक शब्द यांनी गुळगुळीत आणि अर्थहीन बनवून टाकले आहेत.

केंद्रात आणि इतर राज्यातही ही असे नमुने आहेतच. मध्यंतरी मध्यप्रदेशच्या एका मंत्र्यांनी महिलांच्या पोषाखाची उठाठेव केली. एका मंत्र्यांनी सैन्यात जबाबदार पद भूषवणार्‍या कर्नल सोफिया यांना दहशतवाद्यांची बहीणच बनवून टाकले. आपण काय आणि का बोलतो, कोणासाठी बोलतो असा साधा प्रश्नही त्यांना आणि त्यांच्या अर्ध्वयूना पडत नाही. यांच्यामुळे राजकीय सभ्यता आणि साधनशुचिता हे शब्दच राजकारणातून हद्दपार झाले आहेत.

पण यामुळे जनतेचे नुकसान होते. लोकशाहीला बट्ट्या लागतो. ती अर्थहीन ठरण्याचा धोका निर्माण होतो. सामाजिक शांतता अनेकदा धोक्यात येते. शहरात कायदा आणि सुववस्था धोक्यात येऊ शकते. त्याचे परिणाम निष्पाप माणसांनाच भोगावे लागतात. प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी जनतेने त्यांना निवडून दिले आहे याचा मात्र सोयीस्कर विसर पडतो. युती आणि आघाड्यांच्या राजकारणात विकासाचा बळी जातो असे ज्येष्ठ नेत्या मृणाल गोरे नेहमी म्हणत. त्याचा पुरेपूर अनुभव जनता घेत आहे आणि लोकशाही मात्र अधिकाधिक केविलवाणी बनत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वृक्षवल्ली आम्हा सोयरे, अधिकारी चरे!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - सल्लागार संपादक पावसाळा आला की महापालिकेला झाडांविषयी एकदम उमाळा यायला लागतो. केव्हा एकदा वृक्षारोपणाचे टेंडर काढू अन् हे पवित्र कार्य...