अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताचे वर्णन ‘केवळ दुर्दैव’ असेच होऊ शकेल. अन्यथा, वैमानिकाला जरा तरी वेळ मिळाला असता. त्याने धोक्यात असल्याचा आणि मदतीचा संदेश पाठवला होता. तो वाचणार्यांना विचार करण्याची संधी मिळाली असती. तसे काहीच घडले नाही. पत्त्याच्या बंगल्यासारखे विमान कोसळले. तेही डॉक्टरी शिकणार्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर.
या अपघाताने पुन्हा एकदा मनुष्यजन्माचे क्षणभंगुरत्व देशाने अनुभवले. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे कळते पण ते वळणे म्हणजेच त्यातील मर्म स्वीकारणे किती अवघड आहे याची प्रचिती प्रत्येक जण घेत आहे. हे पराधीनत्व तरी किती पराकोटीचे असावे? काही जण त्यांच्या अंतिम प्रवासाला गेले. इतक्या जीवघेण्या अपघातातून विकास रमेशकुमार मात्र वाचले. भूमी चौहानचे वाहन वाहतूक जाममध्ये फसले म्हणून तिचे ते विमान चुकले. विमानात बसलेल्या प्रत्येकाची एक भावनिक कहाणी असेल. त्या कळल्यानंतर फक्त हळहळ अधिक तीव्र होते.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी काही महिन्यांच्या अवधीनंतर त्यांची पत्नी आणि मुलीच्या भेटीला चालले होते.सॉफ्टवेअर अभियंता प्रतीक जोशी त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांना कायमचे त्यांच्याबरोबर घेऊन चालले होते. प्रतीक लंडनमध्ये स्थिरावत असताना ते सगळे भारतात राहात होते. प्रयत्नान्ती हा दुरावा ते संपवणार होते. हवाईसुंदरी मैथिली पाटील महाराष्ट्र पनवेलमधील नाव्हा गावाची. हलाखीच्या परिस्थितीत तिने तिच्या हवाईसुंदरी होण्याच्या स्वप्नाचा पाठलाग केला होता असे तिचे कुटुंबीय सांगतात.
भारतात पत्नीच्या अस्थी विसर्जित करून अर्जुनभाई पाटोलिया परत लंडनला चालले होते.नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे येथील दीपक पाठक हा क्रु मेंबर होता. अपघातग्रस्त विमानातील ब्लॅकबॉक्स सापडला आहे. त्यामुळे अपघाताची कारणे कळू शकतील. घडणार्या प्रत्येक गोष्टीतून माणसाने धडा घ्यावा असे म्हटले जाते. या अपघातातून किंवा एरवी घडणार्या अशा सगळ्याच घटनांमधून धडाच घ्यायचा झाला तर? अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतील. उदाहरणार्थ, बोईंग विमानाच्या सुरक्षिततेविषयी आक्षेप घेतले जातात. ते आक्षेप कंपनीने गंभीरपणे घेतले असे सांगितले जाते. तसे ते प्रवाशांच्या देखील अनुभवास यायला हवे.
अपघाताची विश्वासार्ह माहिती देण्यातील दिरंगाई अफवांना कारण ठरते. तसे घडू न देणे उचित ठरेल. माणसेही काही शिकू शकतील. मृत्यू कोणालाही, कधीही येऊ शकेल. ते कोणाच्याही हातात नाही. तेव्हा रोज उगवणार्या दिवशी ‘माणसांशी माणसासम’ वागणे नक्की आचरणात आणले जाऊ शकेल. कारण खेळ कुणाला दैवाचा कळला हेच सत्य आहे.