Tuesday, September 17, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : ३ ऑगस्ट २०२४ - इतिहासातून माणसे धडा घेतात?

संपादकीय : ३ ऑगस्ट २०२४ – इतिहासातून माणसे धडा घेतात?

इतिहासातून माणसांनी धडे घ्यावेत, अशी जाणत्यांची अपेक्षा असते. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या म्हणीचा गर्भीतार्थ कदाचित तोच असावा. पण तसे घडताना मात्र आढळत नाही. अन्यथा ज्या दिवशी महाराष्ट्रातील माळीण दुर्घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली त्या दिवशीच कर्नाटकातील वायनाडमध्ये चार गावे वाहून गेली नसती. या दुर्घटनेचा धक्काही ओसरला नव्हता तोच केदारनाथमध्ये भूस्खलन झाले.

- Advertisement -

पूर्वीचा कथांमधील, धड्यांमधील पावसाळा रिमझिम पाऊस घेऊन यायचा. ओढे खळखळ वाहायचे. धरणी हिरवा शालू पांघरायची. पण सध्याचा पावसाळा मात्र दरडी कोसळणे, अचानक पूर येणे, कमी कालावधीत प्रचंड पाऊस पडणे अशी संकटे घेऊनच येताना आढळतो. पावसाचा स्वभाव बदलतो आहे. त्याला प्रतिसाद देण्याची पद्धत बदलायला हवी एवढेदेखील प्रशासनाच्या आणि लोकांच्या खरेच लक्षात येतच नसेल का? दरवर्षी दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची यादी सरकारी संस्थाच प्रसिद्ध करते.

प्रशासनात आपत्ती निवारण कक्ष असतात. त्यांना सज्जतेचे आदेशही दिले जातात. पण दरडी कोसळतातच. पुराचा फटका बसतोच. असे का घडते याचे उत्तर जनतेला देणे ही सरकारचीच जबाबदारी आहे, कारण तो सरकारचा नाकर्तेपणा आहे. या नाकर्तेपणाची यादी मोठी आहे. विकासाच्या नावाखाली डोंगररचनांमध्ये अतिक्रमण हे त्याचे मूळ आहे. त्या मुळावर घाव घातला जाईल का? कधी जाईल? त्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती दाखवली जाईल का?

या प्रश्नांची उत्तरे लोकांना मिळायलाच हवीत, पण ते लोकांच्या हातात नाही आणि लोकांच्या जे हातात आहे ते लोक करायला तयार नाहीत. माणसाने निसर्गाला उपभोगाचे साधन बनवले. त्यातून डोंगर जास्तच पोखरले जातात. पर्यटनासाठी वेठीला धरले जातात. डोंगर उताराला, कपारींमध्ये माणसे राहायला जातात. मग तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते आलेच. त्यासाठी झाडे तोड आवश्यक मानली जाते. मोठ्या संख्येने माणसे डोंगरावर राहायला का जातात हा चिंतनाचा वेगळा विषय ठरू शकेल.

पण या सगळ्या धबडग्यामागे सरकारे आणि माणसांनी निसर्गाला गृहीत धरणे आणि मिळून सार्‍यांचा नाकर्तेपणा मानला जाऊ शकेल का? ज्याची किंमत मग दुर्घटनांच्या रूपाने मोजावी लागते. दुर्घटना घडल्या की संबंधित घटकांचे दोषारोप सुरू होतात. सगळेच घटक जबाबदारी नाकारताना किंवा एकमेकांवर ढकलताना आढळतात. तेच सध्या घडतेय. तथापि निसर्गाला गृहीत धरणे बंद करायला हवे, हे समाजाला कधी उमगणार? एकदा घडली तर ती चूक ठरते पण पुनःपुन्हा तीच चूक घडू लागली तर तरीही त्याला चूक ठरवत राहणे ही निसर्गाशी प्रतारणाच मानली जायला हवी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या