समाजात विरोधाभास तरी किती अनुभवास यावा? एकीकडे भारत विश्वगुरू बनण्याचे स्वप्न पाहत आहे. तंत्रज्ञान दररोज नवनवे शोध लावत आहे. देशाचे ग्रुपकॅप्टन शुभांशु शुक्ला आठ जूनला अंतराळात झेप घेणार आहेत. भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम ‘गगनयान’ची तयारी सुरु आहे. देशात निम्म्या लोकसंख्येकडे स्मार्ट मोबाईल आहेत. प्रगतीच्या शिखरांचे असे कितीतरी बदल सांगितले जाऊ शकतील, पण त्याचवेळी दुसर्या बाजूला आजही करणी, काळी जादू किंवा जादूटोणा केल्याच्या आरोपावरून हत्येच्या घटना घडतात.
देव-देवस्की करून अडचणी सोडवतो, असे सांगून दोन-तीन कुटुंबांची सुमारे चाळीस लाखांची फसवणूक केल्याची घटना अलिबागमध्ये घडली. अंधश्रद्धांना खतपाणी घालणार्या अशा कितीतरी घटना सांगितल्या जाऊ शकतील. लोक बाबा-बुवांच्या कच्छपी लागतात. पैशांच्या लालसेने नरबळी देण्यास धजावतात. पैशांच्या पाऊस पडावा यासाठी कष्टाने कमावलेला पैसा भामट्यांवर उधळतात. मनवसे पुत्र होती, तरी का करावा लागे पती?फ असा प्रश्न संत तुकाराम महाराजांनी विचारला आहे. तरीसुद्धा मूल होण्यासाठी कुटुंबातील महिलांना रोजरोस तथाकथित बुवांच्या आश्रमात सोडून जाणारी माणसे समाजात आहेत.
जनमानसावरील अंधश्रद्धांचा हा पगडा कायमचा हटवण्यासाठी संत आणि समाज सुधारकांनी कष्ट उपसले. त्यावर कठोर प्रहार केले. अभंग आणि शिक्षण प्रसारातून लोकांची समज वाढवण्याचा प्रयत्न केला. ‘उद्धार संत न करिती। मार्ग सांगती जनांपति। त्यांच्या बोधवचने प्रगती। केली पाहिजे साधके’ असा उपदेश केला. त्याला काही प्रमाणात सकारात्मकतेची फळे जरुर लागली, पण अंधश्रद्धांची मुळे अजूनही किती खोलवर रुजली आहेत ते व उल्लेखित घटना दर्शवतात. हा शिक्षणाचा पराभव मानावा की, लोकांची वाढती लालसा? लोकांनी धार्मिक जरूर असावे. ज्याने-त्याने ज्याचा-त्याचा धर्म पाळावा याची परवानगी संविधानही देते.
समस्या आहे ती धार्मिकतेच्या बुरख्याआडून शोषण करणार्या वृत्तीची! धर्माचा स्वार्थासाठी वापर करण्याची! त्याला आळा कसा घालणार? माणसे अंधश्रद्धांच्या इतके आहारी जातात की, त्यांच्यासारख्या हाडामासाच्या माणसांचा जीव घेण्यास ते क्षणभरही मागेपुढे पाहत नाहीत. समाजातील भोंदूबाबांचा बुरखा फाडण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते सातत्याने करतात. तरीही लोक शहाणे होत नाहीत. अशा लोकांचे वर्णन संत तुकाराम महाराज ‘वेड लागले… या लोकांसी वेड लागले…’ या भारुडातून करतात. ते आधुनिक काळातही तंतोतंत लागू पडते.
सरकारने जादूटोणाविरोधी कायदा संमत केला आहे. कायदा निर्माण होऊन एक तप उलटून गेले, पण त्या कायद्याचा धाक निर्माण करण्यात सरकार मात्र कमी पडले आहे किंवा कायदा संमत केला म्हणजे जबाबदारी संपली, असा भ्रम सरकार दरबारी जोपासला जात असावा. अन्यथा, असा कायदा संमत करणारे पहिले राज्य म्ह्णून पाठ थोपटून घेताना कायद्याचा प्रभावी वापर करण्यास पूरक वातावरण निर्माण करण्याचा विसर सरकारला पडला नसता. ही एक गंभीर सामाजिक गुंतागुंतीची परिस्थिती आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागतील. सामाजिक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कायद्याचा प्रभाव व सामाजिक कार्यकर्त्यांना पाठबळ देणे ही मात्र सरकारचीच जबाबदारी आहे.