मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारला ५ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. सरकारला एक वर्ष होऊनही विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे या मुद्यांवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्रिपद रद्द करण्याची मागणी करत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असल्याचा मुद्दा उपस्थित करत ही मागणी केली. ठाकरे यांच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्रिपद रद्द करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी ही अप्रत्यक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टार्गेट असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या या मागणीनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘पद कोणतेही असो, काहींना कायमच पोटदुखी असते’, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
काय म्हणाले उध्दव ठाकरे?
महायुती सरकारने दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेतेपद अद्याप दिलेले नाही. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “एक वर्ष उलटूनही सरकारने विरोधी पक्षनेतेपद दिलेले नाही. सरकार विरोधी पक्षाला का घाबरत आहे? तुम्ही आम्हाला नियम आणि कायदे दाखवत असाल, तर संविधानात उपमुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तरतूद नसल्यामुळे हे पद तात्काळ रद्द केले पाहिजे,” अशी मागणी ठाकरे यांनी केली.
तिनही पक्षांचे नेते एकच असून भाजपची बी टीम
भाजपला लक्ष्य करत उद्धव ठाकरे यांनी महायुतीतील शिंदे आणि पवार गटाला अॅनाकोंडा गिळल्याशिवाय राहणार नाही, अशी खोचक टीका केली. तिन्ही पक्षांचे नेते एकच असून हे दोन्ही पक्ष भाजपची बी टीम असल्याचेही ते म्हणाले. ठाकरे यांची उपमुख्यमंत्रिपद रद्द करण्याची मागणी ही अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना लक्ष्य करणारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
तुम्हीच त्यांना जमालगोटा द्या
“काही लोकांना अजूनही पोटदुखी आहे. मी मुख्यमंत्री झालो तरी त्यांना पोटदुखी होती, आता मी उपमुख्यमंत्री झालो तरी त्यांना पोटदुखी आहे. त्यांची पोटदुखी जाण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना सुरू केली तरी त्यांची पोटदुखी जात नाही. आता तुम्हीच त्यांना जमालगोटा द्या. आता ते म्हणत आहेत की उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य आहे, जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते म्हणत होते की घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे. आताच्या झालेल्या निवडणुकीत तुम्ही घरात बसून राहिलात. बाहेर तर आलाच नाहीत. मग आम्हाला पत्रकार विचारतात की महाविकास आघाडी कुठे आहे? मग त्यांना आम्ही म्हटले की महाविकास आघाडी घरी बसली आहे”, अशी टीका करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यात एकीकडे भाजप आणि महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना, विरोधी पक्षनेतेपदावरून सुरू झालेल्या या राजकीय जुगलबंदीमुळे येणाऱ्या काळात विधानसभेचे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




