अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील व्यापारी दीपक लालसिंग परदेशी (वय 68) यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोघा संशयितांविरोधात तोफखाना पोलिसांनी सुमारे 500 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. खंडणीसाठी अपहरण, खून, आणि पुरावा नष्ट करण्याचे गंभीर आरोप या संशयित आरोपींवर ठेवण्यात आले आहेत.
या प्रकरणी अटक करण्यात आलेले संशयित म्हणजे किरण बबन कोळपे (वय 38, रा. विळद, ता. अहिल्यानगर) आणि सागर गिताराम मोरे (वय 28, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) हे असून त्यांनी परदेशी यांचा अपहरण करून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 फेब्रुवारी 2025 रोजी दीपक परदेशी अचानक बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबियांनी दुसर्याच दिवशी तोफखाना पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली. स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी संयुक्त तपास करत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे तपासाची साखळी मजबूत केली.
सीसीटीव्हीमध्ये दिसलेली संशयास्पद इंडिका कार ही किरण कोळपे वापरत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी कोळपे आणि मोरे यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी परदेशी यांच्या खुनाची कबुली दिली. त्यांनी सांगितलेल्या माहितीवरून निंबळक बायपास जवळील नाल्यातून मृतदेह हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी केला. त्यांनी तांत्रिक तपासातून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. परदेशी यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांबाबत संबंधित व्यक्तींचे जबाब, साक्षीदारांचे नोंदी, आणि इतर पुरावे गोळा करत या गुन्ह्यातील प्रत्येक धागा स्पष्ट केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खंडणीसाठी रचलेला घातक कट
परदेशी यांनी विळद येथील चौघांकडून थकबाकी वसुलीचे काम या संशयित आरोपींना दिले होते. मात्र पैसे वसूल न झाल्याने संशयित आरोपींनी उलट परदेशी यांच्याकडूनच 10 कोटी रूपयांची खंडणी उकळण्याचे ठरवले. त्यासाठी परदेशी यांना कारमध्ये बसवल्यानंतर कोळपे याने त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. प्रतिकार करत असताना मोरेने नायलॉनच्या दोरीने त्यांचा गळा आवळला. परदेशी यांनी कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याने दोघांनी त्यांचे हातपाय बांधले आणि अखेरीस कारमध्येच खून केला.
तांत्रिकसह सर्व प्रकारचे पुरावे गोळा करून किरण कोळपे, सागर मोरे विरोधात खंडणीसाठी अपहरण करून खून करणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमान्वये दोष ठेवत दोषारोपत्र दाखल केले आहे.
– आनंद कोकरे, पोलीस निरीक्षक, तोफखाना.