बीड | Beed
बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराड तुरुंगात गेल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैऱ्या झडल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील कथित गैरव्यवहार प्रकरणी आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमात भाषण करणे टाळले होते. आता जवळपास २०० दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी आपले मौन सोडले आहे.
बऱ्याच दिवसांनी मी बोलतोय. न बोलण्याची डबल सेंच्युरी माझी झाली आहे. २०० दिवस न बोलता काढले आहेत. या दिवसात जे काही घडले त्यात मला एक गोष्ट जिव्हारी लागली. ती म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी. माझ्याशी वैर होते तर माझ्या मातीची बदनामी का? असा सवाल करत धनंजय मुंडेंनी विरोधकांना उत्तर दिले. ते बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळव्यात बोलत होते.
आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्यावतीने ‘निर्धार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी म्हटले की, आज भाषण करणार नव्हतो. इथे बोलावे की मैदानात बोलावे असा प्रश्न होता. पक्षाची बीड जिल्ह्याकडून असलेली अपेक्षा पूर्ण करू असे वचन प्रदेशाध्यक्षांना देऊयात असे मुंडे यांनी म्हटले.
वैर माझ्याशी आहे तर माझ्या मातीची बदनामी कशाला केली
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, न बोलण्याची डबल सेंच्युरी झाली आहे. मी २०० दिवस न बोलता काढले आहेत. या दिवसांमध्ये अनेक गोष्टी घडल्या. यामध्ये एक गोष्ट माझ्या जिव्हारी लागली आहे. माझ्या बीड जिल्ह्याची बदनामी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. ज्यांनी बदनामी केली, तो या मातीतला असेल किंवा मातीच्या बाहेर असेल त्यांना एवढंच सांगायचे आहे की, वैर माझ्याशी आहे तर माझ्या मातीची बदनामी कशाला केली, असा सवाल त्यांनी केला.
तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता
यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना शेरो-शायरीतून उत्तर दिले. ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना, एक व्यक्ती, एक जिल्हा, एक माती, एक मतदारसंघ अशा पद्धतीने बदनामी केली. त्यांच्याविषयी आपण चार ओळी म्हणणार आहोत. ‘तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नही सकता, अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता’, अशी शायरी करत धनंजय मुंडे यांनी विरोधकांना आपण पराजित झालो नाही. खचलो नाही असे ठणकावून सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




