मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणीचा आरोप केला होता.
त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्यानंतर अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
देशमुखांच्या राजीनाम्याने आता गृहमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार? याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्रिपदाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर जाणार याबाबत तर्कवितर्क सुरु झालेत.
दरम्यान गृहमंत्रीपदी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दिलीप वळसे पाटलांकडे याआधी उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी होती. मात्र गृहमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ही जबाबदारी अजित पवार यांच्यावर देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.